

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत दरवर्षी पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरत असतो. यंदा या बाजारात गाढवांची संख्या खूपच कमी होती. यंत्रयुगात गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाल्याने या बाजाराला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र यंत्राच्या युगातही गाढवांची किंमतही टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावर्षी गाढवांची संख्या कमी असल्याने पौष पौर्णिमेपूर्वीच गाढवांचा बाजार संपत आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. जेजुरी येथील बंगाली पटांगणात सुमारे चारशे ते पाचशे गावठी गाढवे विक्रीसाठी आली आहेत. त्यांना 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. हा दर गाढवांचे दात पाहून ठरत होते.
दोन दातांचा दुवान, चार दातांचा चवान, संपूर्ण दातांचा अखंड यावरून गाढवाची किंमत ठरत होती, तर गुजरातमधील अमरेली भागातून 90 गाढवे विक्रीसाठी आली होती. बाजार भरण्यापूर्वी या गाढवांची विक्री झाली. 50 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांप्रमाणे एका गाढवाची विक्री झाली.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच कर्नाटक, आंध प्रदेशातील व्यापारी गाढवांच्या खरेदीसाठी आले आहेत. पौष पौर्णिमेनिमित्त बहुजन समाजाच्या लोक देवदर्शनाबरोबरच पारंपरिक पद्धतीने गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी दरवर्षी येतात.
पूर्वी गाढवांचा हा बाजार संपल्यानंतरच जात पंचायत, मुलींचे विवाह ठरविले जात होते. ही प्रथा गेली 10 वर्षांपासून बंद झाल्या आहेत. मात्र, वैदू समाज कुस्तीप्रिय असून, बाजारानंतर कुस्त्यांचे आखाडे जेजुरीत भरविले जातात. यंदा हा आखाडा 4 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या आखाड्यातील कुस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात मल्ल उपस्थित राहतात.