

उमेश कुलकर्णी
दौंड: हे बिटिशकाळातील ऐतिहासिक रेल्वे जंक्शन. सुमारे 130 वर्षांचा वारसा लाभलेल्या या स्थानकातून पूर्र्वी रोज जवळपास सव्वाशे प्रवासी व मालगाड्यांची ये-जा होत असे. यामुळे शहरातील व्यापार, बाजारपेठ आणि स्थानिक अर्थव्यवस्था तेजीत होती. मात्र, मागील पाच-सहा वर्षांत दौंड स्टेशनचे महत्त्व लक्षणीयरीत्या घटले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वे प्रशासनाने नागरिकांना विश्वासात न घेता शहरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर ‘दौंड कॉर्ड लाईन’ हे नवीन स्थानक सुरू केले. उद्घाटन न करता सुरू करण्यात आलेल्या या स्थानकामुळे जुन्या जंक्शनचा वर्दळीचा रुबाब पूर्णतः कमी झाला.
दौंड कॉर्ड लाईन स्थानक शहरापासून दूर असल्याने प्रवाशांना वाहतुकीसाठी जादा खर्च करावा लागतो. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम तिघांचाही तोटा होत आहे. याच कारणाने व्यापारी पुण्याकडे स्थलांतरित होत असून, स्थानिक नागरिक मात्र अडचणीत सापडले आहेत. दौंडमधील राजकीय नेत्यांमध्ये एकता नसल्याने रेल्वे प्रशासनाला मुक्तपणे निर्णय घेण्याचा वाव मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही स्थानिकांनी दाखवलेल्या विरोधावर राजकीय दबाव आणला जातो, असा आरोपही ऐकायला मिळतो.
रेल्वे टर्मिनलच्या मागणीकडे दुर्लक्ष
उरुळी कांचन व खडकी येथे सब-टर्मनिलचे काम जलदगतीने पूर्ण केले जात असताना, दौंडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी टर्मनिलची गरज दुर्लक्षिली गेली आहे. बारामती, अहिल्यानगर, फलटण, कर्जत इत्यादी दिशांनी उत्तम रस्ते दळणवळण, प्रशस्त रेल्वे जागा तसेच पाण्याची उपलब्धता असूनही दौंडकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
निधी असूनही कामांचा रेंगाळलेला पेच
दौंड रेल्वेस्थानकासाठी अमृतभारत योजनेअंतर्गत 40 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून, आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही सुशोभीकरणाची कामे कासवगतीने सुरू आहेत. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते काम, रेल्वे कॉलनीतील गैरगरजेच्या ठिकाणी केलेली कामे आणि क्वॉलिटी कंट्रोल विभागाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. रेल्वेस्थानक परिसरातील अनेक कामे नियमांनुसार वेळेत पूर्ण होत नसल्याचे स्पष्टपणे जाणवते.
नागरिकांचा आरोप आणि मागणी
‘बारामती झकास, दौंड भकास’ असा नागरिकांचा सूर.
स्थानिक नेते ‘ताटाखालचे मांजर’, बारामतीला विरोध करण्याची हिंमत नाही.
दौंडचे महत्त्व कमी करण्याचे राजकीय नियोजन असल्याचा संशय.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दौंडच्या विकासासाठी ठोस भूमिका घ्यावी.
जुन्या जंक्शनवर लांबपल्ल्याच्या गाड्यांचे टर्मनिल उभे करावे.
सुशोभीकरण व सुविधा विकास जलदगतीने पूर्ण करावेत