

भरत मल्लाव
भिगवण: शहाजी काळे यांनी भिशीच्या तणावातून केलेल्या आत्महत्येनंतर भिगवणमधील अवैध भिशी व सावकरकीची दाहकता बाहेर पडू लागली आहे. येथील बाजारपेठेतील सत्तर टक्के व्यावसायिक भिशी व सावकारांच्या विळख्यात सापडले आहेत. सावकारकी व भिशीच्या जंजाळात सापडलेला प्रत्येक व्यावसायिक किमान दीड दोन कोटींच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही सावकार तर दिवसभरात पाच ते दहा लाखांचे व्याज गोळा करतात. काही भिशीचालकांचा महिन्याचा नफा हा दोन ते सहा लाखांपेक्षा अधिक आहे.
एखाध्या कंपनीच्या आर्थिक उलढालीला मागे टाकेल असा भिशीतील व्यवहार येथे चालत आहे. भिगवणजवळील; परंतु दौंड तालुक्यातील एका गावातील तात्याची सावकारकी तर चर्चेचा खास विषय ठरली आहे. इतरही सावकारांची चलती मोठी असली, तरी तात्याचा रुबाब काही वेगळाच आहे. हा तात्या किमान दहा लाखांचा गल्ला जमविल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सावकारकीतून होणारे संभाव्य धोके आधीच ओळखून हा तात्या कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, याची खुबीने काळजी घेतो. सावकारकीच्या ओझ्याखाली दबलेल्या अनेकांच्या जमिनी देखील थेट खरेदी घेतल्याची चर्चा आहे. एका भिशीचालकाने कोट्यवधी रुपये रखडून ठेवल्याने अनेकांची झोप उडाली आहे. इंदापूरनंतर सर्वांत मोठा भिशी घोटाळा भिगवणमधील असल्याची चर्चा आहे.
या भागात अवैध भिशीचालकांमध्ये काही महिलाही आहेत. वास्तविक, बँक आणि पतसंस्था यांना पर्याय म्हणून व्यावसायिकांनी भिशीचा पर्याय शोधला होता. परंतु, यात काही पांढरपेशी व्यक्तींनी प्रवेश करीत भिशीला व्यावसायिक स्वरूप आणले. यामुळे भिशी बदनाम झाली. काहींनी तर सावकरकीची पाळेमुळे इतकी घट्ट करून ठेवली आहेत, की यातून अडकलेले सुटूच शकत नाहीत. भिशी व सावकारांचा दबाव, मानसिक छळ आत्महत्येला प्रवृत्त करणारा ठरत आहे. एकट्या काळे यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात 36 नावे समाविष्ट असतील, तर या भागात भिशी व सावकारकी करणाऱ्यांचे जाळे किती व्यापक प्रमाणात असेल, याची कल्पना न केलेली बरी.
शहाजी काळे यांच्या आधीही अनेकांनी आत्महत्या केली आहे. कित्येकांना भिगवण सोडून पलायन करावे लागले. भिशी व सावकारीतून झालेल्या व्यक्तींच्या आत्महत्या आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबाची झालेली हानी व नरकयातना देखील डोके सुन्न करणारी आहे. आजही भिगवण व परिसरातील कित्येक लहान-मोठ्या शेकडो व्यावसायिकांच्या गळ्याभोवती भिशी व सावकारकीचा फास आहे. यामध्ये पंचवीस लाख ते तीन कोटींच्या ओझ्याखाली दबलेल्यांची यादी लांबलचक आहे. त्यामुळे भिशी व सावकरकीला आळा बसणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावकारकीमुळे होणाऱ्या आत्महत्येवरून राज्यात कायदा मंजूर होऊन वर्षानुवर्षे उलटली असली तरी त्याचा प्रभावी वापर होत नाही, ही चिंतेची बाब आहे. या भिशीचालकांना व सावकारांना वेळोवेळी राजकीय व अधिकाऱ्यांचे बळ मिळत असल्याने हा व्यवसाय फोफावला. याला आता आळा घालण्याची गरज आहे.