

बारामती: सणासुदीचे दिवस जवळ आले असताना खरेदीची लगबग वाढली आहे. मात्र, वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुलांचे शिक्षण, घरभाडे, किराणा, भाजीपाला, दूध, खाद्यतेल, खोबरे, साखर, शेंगदाणे यांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने बारामतीकरांच्या घरगुती बजेटचा ताळमेळ बिघडला आहे. त्यातच सणासुदीच्या काळात उपवासाचे पदार्थ, सुका मेवा आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
मागील काही काळात किराणा मालाच्या दरात झालेली वाढ थेट गृहिणींच्या स्वयंपाकघरावर परिणाम करणारी ठरत आहे. खाद्यतेल, खोबरे, शेंगदाणे, साखर, डाळी, मसाले तसेच अन्य आवश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे महिन्याचे किराणा बजेट वाढले आहे. पूर्वी ठराविक रकमेत महिन्याचा किराणा भागत असे; मात्र आता त्याच वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
भाजीपाल्याच्या दरातील चढ-उताराबरोबरच दूध, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा खर्चही नागरिकांच्या आर्थिक गणितावर परिणाम करीत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढत असताना उत्पन्नात त्या प्रमाणात वाढ होत नसल्याने मध्यमवर्गीय आणि कष्टकरी कुटुंबांना खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः गृहिणींसमोर महिन्याचे बजेट सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. महागाईचा फटका केवळ अन्नधान्यापुरता मर्यादित नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शैक्षणिक साहित्य, गणवेश, प्रवास आणि इतर शैक्षणिक गरजांवर होणारा खर्च वाढत आहे.
त्यामुळे पालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. घरातील अन्य गरजा कमी करून मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या दरांवरही झाला आहे. बाहेरचे जेवण, नाश्ता तसेच चहा-नाश्त्याच्या पदार्थांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे रोजच्या खर्चात आणखी भर पडत आहे.
सण साजरा करायचा कसा?
सणासुदीच्या काळात कुटुंबासाठी नवीन कपडे, फराळाचे साहित्य, फळे, सुका मेवा, उपवासाचे पदार्थ आणि इतर वस्तूंची खरेदी करावी लागते. मात्र, बाजारातील वाढलेल्या किमती पाहता गरजेचे खरेदी करतानाही नागरिकांना खर्चाचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे 'सण साजरा करायचा तरी कसा?' असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे.