

पुणे: गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जावा आणि त्याचवेळी सर्वसामान्य पुणेकरांना उत्सवाचा त्रास होणार नाही, या दोन्ही बाबींचा समतोल साधणारा निर्णय प्रशासनाने घ्यावा. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकरांनी घेतलेली भूमिका योग्य असून, त्यांच्या भावनांचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना मांडली.
पाटील म्हणाले की, पुण्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहराची स्वतंत्र ओळख असल्याने उत्सव साजरा करताना या परंपरेचा सन्मान राखला पाहिजे. उत्सवातील भक्ती, आनंद आणि उत्साह कायम राहावा.
मात्र, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तसेच मुक्या प्राण्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक, पोलिस, महापालिका, ध्वनितज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन स्पष्ट व व्यावहारिक नियमावली तयार करावी. तिची अंमलबजावणी कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान पद्धतीने करावी.
गणेशोत्सव तोंडावर असताना या विषयावर वाद निर्माण होणे योग्य नाही. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट धोरण ठरवायला हवे होते. आतातरी सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा. गणेशोत्सव हा राजकीय वादाचा नव्हे; तर श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव आहे. त्यामुळे पुण्याची परंपरा, मंडळांचा सन्मान आणि नागरिकांचे आरोग्य, या तिन्ही बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘४० वर्षांत असा प्रश्न कधी निर्माण झाला नव्हता’
मी स्वतः गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असून, गेली ४० वर्षे मंडळाच्या कार्यात सक्रिय आहे. या प्रदीर्घ काळात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न इतक्या तीव्रतेने कधीही निर्माण झाला नव्हता. गेल्या काही वर्षांतच हा विषय सातत्याने ऐरणीवर येत आहे. गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि सर्वसामान्य पुणेकरांना उत्सवाचा त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली पाहिजे. प्रशासनाने या दोन्ही बाजूंचा समतोल साधणारा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.