

अखिल मंडई मंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कसबा विधानसभा मतदारसंघाचे सलग 17 वर्षे अध्यक्ष, पीएमटीचे माजी चेअरमन, कलमाडी समर्थक, मराठा महासंघाचे नेते, अशी बाळासाहेब अमराळे यांची ओळख. 1997 च्या महापालिकेच्या निवडणुकीत गाडीखाना वॉर्डातून काँग्रेसचे तिकिट मिळूनही जातीय समीकरणांसाठी अखेरच्या क्षणी त्यांना माघार घ्यावी लागली. पीएमटीचे चेअरमन म्हणून चांगले काम केले असले, तरी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेणाऱ्या या निवडणुकीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्याविषयी त्यांच्याच शब्दांत...
बाळासाहेब अमराळे
खरं तर मी मंडई विद्यापीठातील विद्यार्थी. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशभर दंगली उसळल्या. मंडईतील आत्तारांच्या दुकानांची जाळपोळ झाली. पुणे शहर बंदचा नारा दिला गेला. बंद सुरू असताना मंडईमध्ये आम्हा काही तरुणांना अटक करून पोलिस व्हॅनमधून शिवाजीनगर पोलिस मैदानावर नेण्यात आले. त्यावेळी माझ्यावर पहिला राजकीय गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून मी काँग्रेस विचारधारेशी जोडला गेलो.
1992 मध्ये मोठे बंधू चंद्रकांत अमराळे महापालिकेच्या निवडणुकीला उभे राहिल्याने शहराच्या राजकारणाशी संबंध आला. महापालिकेचे नेतृत्व त्यावेळी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांच्याकडून सुरेश कलमाडींकडे येऊ लागले होते. परिणामी मीदेखील कलमाडींच्या कार्यशैलीकडे आकर्षित झालो. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि 1996 पासून अखिल मंडई मंडळाचा अध्यक्ष म्हणून करत असलेल्या कामांमुळे कलमाडींसह अनेक नेते प्रभावित झाले होते. त्यामुळे 1997 च्या महापालिका निवडणुकीसाठी गाडीखाना भागातून मला उमेदवारी देण्याचा निर्णय कलमाडी यांनी जाहीर केला. त्यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरून मी प्रचाराला सुरुवात केली. परंतु, तोच कुठेतरी माशी शिंकली.
ज्येष्ठ नेते व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रामभाऊ गणपुले हे देखील काँग््रेासतर्फे गाडीखाना भागातून उमेदवारी मागत होते. तथापि, कलमाडी यांनी उमेदवारीची माळ माझ्या गळ्यात घातली. कलमाडींच्या या निर्णयामुळे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ व जयंतराव टिळक अस्वस्थ होते. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीमध्ये एकाही बाह्मण उमेदवाराचा समावेश नव्हता, ही बाब त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी रामभाऊ गणपुलेंच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पक्षात दुही माजण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर ज्येष्ठांची मर्जी राखण्यासाठी कलमाडींनी मला माघार घेण्यास सांगितली. ‘महापालिकेत पुढे जेव्हा केव्हा संधी मिळेल, त्यावेळी प्रथम तुमचाच विचार केला जाईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले. कलमाडींच्या शब्दाखातर नाईलाजाने मला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. केवळ माघार घेऊन मी थांबलो नाही, तर गणपुलेंना मी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या प्रचारातही मी सहभागी झालो व त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणले.
माझी पक्षनिष्ठा लक्षात घेऊन कलमाडी यांनीही दिल्या शब्दाप्रमाणे मला पीएमटीत काम करण्याची संधी दिली. त्यावेळीही अनेक दिग्गज पीएमटीच्या सदस्यपदाच्या रेसमध्ये होते. माझे तिकिट कापण्यासाठी अनेक जण सरसावलेे. माझ्याविरुद्ध कलमाडींचे कान भरण्यासाठी कारस्थानेही झाली. पण, कलमाडी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यावेळी कलमाडी मला म्हणाले,‘ज्या माणसाला जास्त विरोध होतो, तोच सर्वाधिक कामाचा असतो, हे मी ओळखतो. कितीही विरोध होऊ द्या, पीएमटीचे सभासदत्व मी तुम्हालाच देणार.’
पीएमटीवर काम करण्याची संधी मिळाल्यावर दुसऱ्याच वर्षी पीएमटी चेअरमनपदाची संधीही चालून आली. त्यावेळीही काहींनी मला चेअरमन पद मिळू नये, असे प्रयत्न सुरू केले. पीएमटी सदस्य सुनील बिबवे यांचे नाव पुढे केले. त्यामुळे मला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली. परंतु, पुढच्याच वर्षी चेअरमनपदाची माळ माझ्या गळ्यात पडली. चेअरमनपदाच्या माझ्या कार्यकाळात स्वारगेट बसस्थानकाचे नामकरण छत्रपती राजर्षी शाहू महाराज, असे करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच विकासाच्या अनेक योजना राबविल्या. पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात माझा विशेष सहभाग होता. त्यामुळेच पीएमपीएमएलचा शिल्पकार अशी माझी ओळख निर्माण झाली. (शब्दांकन : सुनील कडूसकर)