प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कर्करोगाचे निदान झाल्यापासूनचा प्रवास वेदनादायक आणि मानसिक तणाव निर्माण करणारा असतो. मात्र, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहून अनेक रुग्णांनी कर्करोगासारख्या आजारावर मातही केली आहे. अशा 'कॅन्सर सर्व्हायव्हर'नी 'न्यू नॉर्मल' आयुष्याकडे वळताना जीवनशैलीत कटाक्षाने बदल करायला हवेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे कॅन्सरसारख्या आजारावर मात करणेही आता शक्य झाले आहे.
कर्करोगातून पूर्ण बरे झालेल्या व्यक्तींना 'कॅन्सर सर्व्हायव्हर' असे म्हटले जाते. त्यांना सामान्य आयुष्य जगायला प्रोत्साहन मिळावे आणि इतर कॅन्सर रुग्णांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने दर वर्षी 5 जून रोजी 'कॅन्सर सर्व्हायव्हर दिवस' साजरा केला जातो. आयुष्याचा पुढील टप्पा अधिक सुखकर व्हावा, यासाठी आहार, व्यायाम, नियमित आरोग्य तपासणी यावर भर देणे गरजेचे असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
'कॅन्सर सर्व्हायव्हर'च्या जीवनशैलीतील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे मादक द्रव्यांचे सेवन टाळणे. कर्करोगाच्या उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तीने मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. तंबाखूमुळे केवळ कर्करोग परत येण्याची शक्यताच वाढणार नाही, तर हृदयविकार, जठरासंबंधी व्रण इत्यादीसारख्या इतर परिस्थितींनाही धोका निर्माण होतो. स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचे सुनिश्चित करा. योगासने, सूर्यनमस्कार, जॉगिंग इत्यादी प्रकारचे व्यायाम नियमित वेळापत्रकात ठेवावेत.
– डॉ. समीर गुप्ता, सर्जिकल ऑन्कॉलॉजी
विभागप्रमुख, डीपीयू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'कॅन्सर सर्व्हायव्हर'नी सामान्य आयुष्य जगायला सुरुवात करताना शारीरिक, भावनिक, सामाजिक समायोजन आवश्यक आहे. या काळात त्वचा, केस आणि दिसण्यात नवे बदल दिसू शकतात. उपचारांमुळे शिक्षण, व्यवसाय यामध्ये अंतर पडलेले असू शकते. त्यावर मात करण्यासाठी नवीन ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. नव्याने आयुष्य जगत असताना नैराश्य आले, तरी त्यावर मात करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. ध्यान, योग आणि शारीरिक समुपदेशन यामुळे नैराश्यावर मात करता येऊ शकते. स्वतःला व्यस्त ठेवणे, आत्मविश्वास परत मिळवणे, संतुलित आहार राखणे, जीवनाबद्दल सकारात्मक आवश्यक आहे.
– डॉ. प्रीतम कटारिया, सल्लागार, वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट
हेही वचा