

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत सुचविलेले बदल आता राज्य निवडणूक आयोग स्वत:च करणार आहे. महापालिका प्रशासनाला केवळ त्यासंदर्भात विचारात घेतले जाईल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली प्रभागरचनेत पुन्हा हस्तक्षेप करण्याच्या राजकीय मंडळींच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तीनसदस्यीय प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. त्यात तीनसदस्यीय 57 आणि दोनसदस्यीय 1 असे एकूण 58 प्रभाग केलेल्या प्रारूप प्रभागरचनेचे गत आठवड्यात राज्य निवडणूक आयोगापुढे सादरीकरण झाले. त्यात आयोगाने तब्बल 28 त्रुटी काढल्या होत्या. त्यात बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आयोगाचे पत्र आल्यानंतर हे बदल केले जातील, असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रारूप प्रभागरचनेत आयोगाने जे बदल सुचविले आहेत ते आता स्वत: आयोगच करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
हे बदल करताना रस्ते, ओढे, नाले, नदी, डोंगर अशा नैसर्गिक हद्दींची पालिकेच्या अधिकार्यांकडून माहिती घेतली जाईल, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता प्रभागरचनेतील बदल महापालिकेच्या स्तरावर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आयोगाने सुचविलेले 28 बदल करताना सर्वच प्रभागांच्या हद्दीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पातळीवर प्रशासनाकडून हे बदल करताना स्वत:ला अनुकूल अशी प्रभागरचना करता येईल का, या प्रयत्नात असलेल्या राजकीय मंडळींना आता प्रभागरचनेत काहीच हस्तक्षेप करता येऊ शकणार नाही.
प्रारूप प्रभागरचनेत आयोगाने सुचविलेले बदल करताना कच्च्या आराखड्यात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. त्यामुळे जवळपास संपूर्ण रचनाच नव्याने करावी लागण्याची शक्तता आहे. हे बदल करून सुधारित आराखडा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडूनच स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे पुण्यातील काही राजकीय मंडळींनी थेट मुंबईच्या आयोगाच्या कार्यालयात खेट्या मारण्यास सुरुवात केली आहे. भाजप व शिवसेनेचे काही माजी पदाधिकारी बुधवारी आयोगाच्या अधिकार्यांच्या भेटीसाठी मुंबईत ठाण मांडून होते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.