जलदूत प्रणाली चिकटे : सायकलवरून जलसाक्षरतेचे प्रबोधन | पुढारी

जलदूत प्रणाली चिकटे : सायकलवरून जलसाक्षरतेचे प्रबोधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जलदूत प्रणाली चिकटे ने सायकलवरून १० हजार किलोमीटरचा प्रवास पुर्ण केला आहे.

प्रणाली आता २३ व्या जिल्ह्यात म्हणजेच पुण्यात दाखल झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पूनवट गावातून निघालेल्या प्रणाली चिकटे हिने जलसाक्षरतेसाठी जलदूत बनून सायकलवरून १० हजार किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत पुर्ण केला आहे.

येथून पुढे देखील तिचा हा जनजागृतीपर प्रवास सुरूच राहणार आहे.

प्रणाली चिकटे ही २२ वर्षाची युवती आहे. राज्यभरातील नागरिकांमध्ये जलसाक्षरतेबाबत जनजागृती व्हावी,

याकरिता तिने जलदूत बनून पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्यासाठी सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमण सुरू केले आहे.

अधिक वाचा :

मागील एक वर्षभरापासून प्रणालीचा हा प्रवास सुरू आहे.

तिने आतापर्यंत 23 जिल्ह्यांतील खेडो पाड्यांत जाऊन जलसाक्षरता, पर्यावरणाचे रक्षण याबाबत जनजागृती केली.

शुक्रवारी ती पुण्यात दाखल झाली.

पत्रकार भवन येथे तिने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुमंत पांडे, रमाकांत बापू, विनोद बोधनकर, जलनायक राधिका कुलकर्णी, चारुता कडूरकर, सतीश खाडे उपस्थित होते.

यावेळी प्रणालीने जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, पर्यावरणप्रेमी दिलीप कुलकर्णी (कुडावळे ), राज्याचे जलसाक्षरता केंद्र याच्याकडून हा प्रवास करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

प्रणाली म्हणाली, माझ्या सायकल भ्रमंतीचा उद्देश पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण जनजागृती आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास हा आहे.

सभोवताली, दिवसेंदिवस बदलती भोगवादी जीवनशैली, वाढते मानसिक प्रदूषण त्यातून निर्माण होणारे वातावरणीय प्रदूषण,

तापमानवाढ, वातावरणबदल, ऋतुचक्रबदल या बदलाच्या परिणामातुन निर्माण होणार्‍या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजेत.

अधिक वाचा :

सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था,

शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व तळागाळात काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे,

शक्य तितके लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या-त्या भागातील परिस्थिती समजून घेणे,

पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे हेही उद्देश आहेत.

हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे.

मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आहे. हा प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघालेली नाही.

सोबत कोणाचीही प्रवासाला कसलीही स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे, राहणे असते.

सोबत आर्थिक सहकार्य सुद्धा लोकच करतात. प्रवास करत आता वर्ष होत आले आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. कोरोनाच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे.

सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलिस वर्ग सुद्धा सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोरोनाचे संक्रमण होऊ नये, याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे.

– प्रणाली चिकटे, जलदूत

Back to top button