पुणे : जिथे वाडा तिथे बाल गणेश मंडळे… असे पूर्वी समीकरण होते. पण, आता हे चित्र बदलले असून, पुण्यात पूर्वी असलेली 300 ते 350 बाल गणेश मंडळांची संख्या आता 20 ते 25 वर येऊन पोहोचली आहे. वाढते शहरीकरण, लोप पावलेली वाडा संस्कृती, बाल गणेश मंडळांचे मोठ्या मंडळात झालेले रूपांतर आणि शालेय गणेशोत्सवाचा वाढता प्रभाव अशा विविध कारणांमुळे पुण्यात बाल गणेश मंडळांची संख्या घटली आहे.
तर, दुसरीकडे जी बाल गणेश मंडळे अस्तित्वात आहेत ती जल्लोषात अन् आनंदाने यंदाचा उत्सव साजरा करीत आहेत. पुण्यातील काही भागांत असलेल्या बाल गणेश मंडळांकडून दहाही दिवसांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वाडा संस्कृतीमुळे 70 च्या दशकात बाल गणेश मंडळांची संस्कृती रुजली. वाड्यातील मुलांनी एकत्र येऊन अशी मंडळे स्थापन केली. उत्सवासाठी त्यांना वर्गणीही मिळायची आणि त्यांच्या कलागुणांना वावही मिळायचा. पण, 1990 नंतर हे चित्र बदलू लागले. बाल गणेश मंडळांचे रूपांतर मोठ्या मंडळांमध्ये होऊ लागले आणि बाल गणेश मंडळांचे समीकरण बदलू लागले.
आताच्या घडीला पुण्यातील पेठांमध्ये मोजकीच बाल गणेश मंडळे कार्यरत आहे. पण, असे असूनही जी बाल गणेश मंडळे अस्तित्वात आहेत ती आनंदात, उत्साहात गणेशोत्सवाचा वारसा जपत आहेत. 16 ते 22 वयोगटांतील मुले एकत्र येऊन मंडळांमध्ये जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत आहेत. सोमवार पेठेतील श्रीराम बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष समर्थ चव्हाण म्हणाला, 'आमच्या बाल गणेश मंडळाला अनेक वर्षे झालेली आहेत. आमच्या मंडळात 17 ते 22 वयोगटांतील कार्यकर्ते कार्यरत आहेत. या वर्षी आम्ही चंद्रयान-3 मोहिमेवर आधारित देखावा तयार केला आहे. गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक जण वेळ काढून उत्सवात सहभागी होतो.'
पुण्यातील वाडा संस्कृतीमुळे 1960 ते 70 च्या दशकात अनेक बाल गणेश मंडळे कार्यरत होती. यातून मुले एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करायची. आता वाडा संस्कृती लोप पावली, फ्लॅट संस्कृती वाढली. त्यामुळे बाल गणेश मंडळांचे स्वरूपही बदलत गेले. आम्ही बाल गणेश मंडळांचे कार्यकर्ते, असे सांगण्यासही कार्यकर्त्यांना संकोच वाटू लागला. मंडळांचे रूपांतर हळूहळू मोठ्या मंडळांत झाले आणि मंडळे कमी होत गेली.
– आनंद सराफ,
गणेशोत्सवाचे अभ्यासक
हेही वाचा