

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवेज अॅथोरिटी ऑफ इंडिया) वतीने नवले बि—ज ते कात्रज चौकादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या आजूबाजूला असलेली महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरित करण्याचे काम ऑक्टोबर 2022 पासून रखडलेले आहे. दुसर्या बाजूला प्राधिकरणासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व इतर यंत्रणांकडून विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येत आहे. यात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रास तोडण्यात येत असल्याने वीजग्राहकांसह महावितरणला खंडित वीजपुरवठ्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 45 ते 50 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.यात आर्थिक नुकसानही होत आहे.
खोदकामात दिवसा किंवा रात्रीच्या सुमारास भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सतत सुरू असल्याने कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे 45 ते 50 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.
गेल्या पंधरवड्यात 'एमएनजीएल' व इतर यंत्रणेच्या खोदकामात जेसीबीद्वारे तब्बल 14 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. 22 केव्ही क्षमतेची एक वीजवाहिनी तोडल्यामुळे हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा एकाचवेळी खंडित होतो. त्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचार्यांना सातत्याने युद्धपातळीवर काम करावे लागत आहे. 'एमएनजीएल'च्या खोदकामात गेल्या 15 दिवसांत 8 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. त्यामुळे 40 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या वाहिन्या पुन्हा जोडण्यासाठी महावितरणला सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. तसेच, खंडित वीजपुरवठ्यामुळे 12 लाख युनिटचे म्हणजे सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी कात्रज पोलिस ठाण्यात महावितरणकडून फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरित करण्याबाबत अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. वीजयंत्रणा स्थलांतरित करण्याच्या कामाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. मात्र, हे काम ऑक्टोबर 2022 पासून रखडलेले आहे. विशेष म्हणजे, वीजयंत्रणा स्थलांतरित न करता रस्तारुंदीकरणाचे काम करण्यात आल्याने महावितरणच्या रोड क्रॉस 22 केव्ही क्षमतेच्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या 15 ते 20 फूट खोल दबल्या गेल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे अत्यंत खडतर आहे व त्यासाठी दीर्घ काळ लागणार आहे.
महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरित करण्यासाठी प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, या कामास अद्याप गती आलेली नाही. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करणे. वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे, यासाठी महावितरणच्या अभियंते व कर्मचार्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष सहन तसेच दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान महावितरणला सहन करावे लागत आहे.
हेही वाचा :