अहमदनगर जिल्ह्यातील 510 केंद्रांचे बाभळेश्वरला औपचारिक उद्घाटन

अहमदनगर जिल्ह्यातील 510 केंद्रांचे बाभळेश्वरला औपचारिक उद्घाटन

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 लाख 25 हजार किसान समृध्दी केंद्राचे लोकार्पण राजस्थान येथून केले. नगर जिल्ह्यातील 510 केंद्रांचे औपचारिक उद्घाटन या निमित्ताने बाभळेश्वर येथे झाले. यावेळी माजी मंत्री, जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पा. म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले किसान समृध्दी केंद्र शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक ठरतील. किसान समृध्दी केंद्र कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शनाचे महत्वपूर्ण काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतिष बावके, तुकाराम बेंद्रे, सतिष ससाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी भोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, या केंद्राच्या उपलब्धतेमुळे आता पिकास कोणत्या खताची गरज आहे, याचा योग्य सल्ला शेतकर्‍यांना मिळेल. कारण आज विनाकारण शेतकर्‍यांवर अनेक औषधांची सक्ती करुन ते लादले जातात, याला निश्चित आळा बसेल. या केंद्रातून शेतकर्‍यांना शेती विषयक बदलांचे ज्ञान मिळणार असल्याने ही केंद्र कृषी विज्ञान केंद्रांप्रमाणेच गावपातळीवर काम करतील.

शालिनीताई विखे म्हणाल्या, कृषी विज्ञान केंद्रांद्वारे एकाच छताखाली कृषी निविष्ठा उपलब्ध होतील. माती परीक्षण ते बियाणे व औषधांची चाचणीसुध्दा या केंद्रातून होणार असल्याने शेतकर्‍यांची फसवणूक थांबेल. पर्यायी खतांचा वापर कृषी क्षेत्रात योग्य पध्दतीने व्हावा यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळणार असल्याने सेंद्रीय शेतीचे पंत प्रधानांचे स्वप्न निश्चित पुर्ण होवून विषमुक्त शेतीकडे वळण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये 1850 किसान समृध्दी केंद्र सुरु झाली. यातून आता गुणवत्ता पुर्ण कृषी साहित्य वितरीत करण्याची जबाबदारी वाढली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या पुढाकाराने आज जिह्यात 510 केंद्रांची औपचारिक सुरुवात झाली. राहाता तालुक्यात 19 ठिकाणी केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रम होत असल्याचे सांगत, जिल्ह्याने 1 रुपयात पिक विमा योजनेमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांचा दूरदृश्य प्रणालीतून संवाद!

उत्तर नगर जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीतून साधलेला संवाद उपस्थितांनी ऐकला व पाहिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news