पिंपरी: नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार : उद्योगमंत्री उदय सामंत

पिंपरी: नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार : उद्योगमंत्री उदय सामंत

पिंपरी, पुढारी ऑनलाईन: आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रातून वाहणारी इंद्रायणी आणि पवना नदी स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे. त्या संबंधित विकास आराखडा (डीपीआर) येणाऱ्या दोन महिन्यांत तयार केला जाणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल. येत्या दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र, परवानगीच्या बाबत काही अडचणी आल्यास तीन वर्षात नदी स्वच्छतेचे काम पूर्ण झालेले दिसेल. नदी स्वच्छतेच्या कामाला आज तत्वतः मंजुरी दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २२ जून रोजी गुरुवारी पिंपरी महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते. सामंत म्हणाले की, पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे, अशी वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या नद्यांमध्ये एमआयडीसीचे पाणी येते. त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर कार्यवाही सुरू केली आहे. नदी स्वच्छतेचा हा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला असून नदी स्वच्छ ठेवण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे.

पवना आणि इंद्रायणी या दोनही नद्या कायस्वरूपी स्वच्छ झाल्या पाहिजेत. जर एमआयडीसीच्या कंपन्याकडून नदीपात्रात पाणी जात असेल, तर त्यासाठी एसटीपी करायचा की सीईटीपी करायचा यावर निर्णय घेतला जाईल. एमआयडीसीचे पाणी नदीत जाऊ नये यासाठी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रातून पवना, इंद्रायणी नदी वाहते. नदी सुधार प्रकल्पासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश केले आहेत. येत्या तीन महिन्यांत हा आराखडा तयार होईल. जवळपास एक ते दीड हजार कोटी रुपयांपर्यंत विकास आराखडा असू शकतो. खर्चाचा हा भार एमआयडीसी, महापालिका उचलणार आहे. जास्तचा निधी लागला तर मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news