Ashadhi Wari : उद्या होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम?

श्रीकांत बोरावके
आळंदी : पांघरायला-अंथरायला घेतलंय… हातात पताका, गळ्यात टाळ घातलाय… समधी बांधाबांध झालीय, अवंदा गर्दी हाय म्हणतात. पाऊस लांबलाय अन् पेरण्या रखडल्यात; पण माउली बघून घेतील हो..! चला माउली, वारीला.!! असे म्हणत वारकर्यांच्या दिंड्यांनी कधीच गावकुस सोडत आळंदी गाठली आहे. वारकर्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली आहे. राज्याच्या विविध भागांतून रविवारी (दि. 11) सायंकाळी चार वाजता होणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत.
पालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण कारवाई करीत रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेट तयार ठेवण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनातर्फे शहरात जवळपास 2 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. देवस्थानतर्फे सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी वापरण्यात येणारा रथ सज्ज आहे.
आषाढी वारीच्या काळात लागणार्या विविध वस्तूंची भांडारगृहात तजवीज करण्यात आली आहे. माउलींसोबत लागणारी वस्त्रे, पूजा साहित्य, अन्नधान्य साहित्य, अब्दागिरी, तंबू, भांडी यांची पूर्ण स्थितबद्ध यादीच गेल्या दोन महिन्यांपासून तयार आहे. रथाला देखील झळाळी देण्यात आली आहे. खांदेकरी तरुणांना पास देण्यात येणार आहे.
मान्यवर, निमंत्रित आणि मानकरी यांना पास देण्यात आले असून, पासधारक व्यक्तींनाच मंदिरात सोडण्यात येणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या 47 दिंड्यांना मंदिरात सोडण्यात येणार आहे. एकंदरीत, सोहळ्यासाठी अलंकापुरीत लगबग सुरू झाली असून, मंगळवारी होणार्या प्रस्थानासाठी आभाळातील ढगांबरोबर वैष्णवांनी देखील आळंदीत दाटी केली आहे.
असा असेल प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम
रविवारी (दि. 11) माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
1) पहाटे चार ते साडेपाच : घंटानाद, काकड, पवमानाभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती.
2) पहाटे पाच ते सकाळी नऊ : भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा.
3) सकाळी सहा ते दुपारी बारा : भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.
4) सकाळी नऊ ते अकरा वाजता : वीणामंडपात कीर्तन.
5) दुपारी बारा ते साडेबारा : गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.
6) दुपारी बारा ते दोन : भाविकांना समाधिस्पर्श दर्शन. 7) दुपारी अडीच ते तीन : प्रस्थान सोहळ्यातील 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश.
8) दुपारी चार : प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल.
यात श्री गुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकर्यांना नारळ प्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकर्यांना मानाची पागोटी वाटप, श्री गुरू हैबतबाबांतर्फे नारळ प्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळ प्रसाद वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडेल. प्रदक्षिणा मारून गांधीवाडा मंडप येथे मुक्कामी राहील.
हेही वाचा
दंगलीच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे विशेष पथक
पुणे-दिल्ली विमानातील प्रवासी घामाघूम; काय आहे कारण ?
कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदासाठी सात संचालकांचे गुडघ्याला बाशिंग