पुणे: ओतूरच्या बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे प्रस्थान
ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि. ८) सकाळी १० वाजता मोठ्या दिमाखात प्रस्थान करण्यात आल्याची माहिती पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे यांनी दिली.
श्री क्षेत्र ओतूर येथे श्री बाबाजी चैतन्य महाराजांचे संजीवन समाधी मंदिर असल्याने या पालखी सोहळ्यास मोठे महत्व आहे. पालखी सोहळ्यास ६३ वर्षांची परंपरा आहे, परिणामी पंचक्रोशीतील भाविक या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.
श्री बाबाजी चैतन्य पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे दिमाखात प्रस्थान करताना टाळ-मृदंगाच्या गजरात व रामकृष्ण हरीच्या जय घोषात शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखीचे प्रस्थान ओतूरमधून करण्यात येऊन हा पालखी सोहळा बेल्हे, राळेगणसिद्धी, सिद्धटेक, राशीन मार्गे २६ जून रोजी पंढरपूर येथे प्रवेश करणार आहे.
पालखी सोहळ्याचा पंढरपूरमध्ये सरासरी पाच ते सहा दिवस मुक्काम असणार आहे. तर पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास हा ३ जुलै रोजी सुरू होणार आहे. नातेपुते, सासवड, आळंदी, राजगुरुनगर मार्गे ओतूर येथे १६ जुलै रोजी पालखी सोहळ्याचा समारोप होणार आहे.
हेही वाचा:
गहाळ झालेले तब्बल १९ मोबाईल हस्तगत
पुणे: कारागृहातील कैदीही रंगले पांडुरंगाच्या भक्तीरसात
पुणे : कार्ल्यात एमटीडीसीचे 38 एकरांवर चाणक्य केंद्र