उसाच्या लागण्या सुरू; पाऊस गायब, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

उसाच्या लागण्या सुरू; पाऊस गायब, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
Published on
Updated on

नानगाव : पुढारी वृत्तसेवा: जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असते, त्यामुळे शेतकरी मशागतीची कामे लवकर उरकून घेतो आणि जून महिन्यातील पावसाच्या सरीवर उसाची लागवड करतो. मात्र, मागील आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करताना दिसत आहे. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उसाची शेती करतात.

बरेचसे शेतकरी जून महिन्यात उसाच्या लागणी करीत असतात. गहू आणि कांद्याचे पीक झाल्यानंतर शेतकरी ऊस लागणीसाठी शेतीची मशागत करून ठेवतात. जूनमध्ये सुरुवात झालेल्या पावसामुळे सर्‍यांमध्ये पावसाचे पाणी साचते व शेती ऊस लागवडीसाठी तयार होते.
यंदा दि. 8 जून रोजी पावसाने दौंड तालुक्यातील बागायती भागातील काही भागांत जोरदार हजेरी लावली तसेच पुढील चार ते पाच दिवस ठिकठिकाणी पाऊस पडला. या वेळी ज्या शेतकर्‍यांचे क्षेत्र ऊस लागवडीसाठी तयार होते अशा शेतकर्‍यांनी लागणी करून घेतल्या.

मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नदीपात्रातील पाण्यावर उसाची लागण केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर होणार्‍या लागणीची उगवणक्षमता चांगल्या प्रकारे होते, असे शेतकरी सांगतात. सध्या शेतकरी ऊस लागणीच्या कामात व्यस्त आहे. चांगल्या प्रकारचे उसाचे बेणे घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो.

सध्या ठिकठिकाणी उसाचे बेणे तोडण्याची कामे सुरू असून, काही ठिकाणी बेणे तोडून शेतात सरीवर अंथरण्याची कामे सुरू आहेत. जर पावसाने सुरुवात केली, तर पावसाच्या पाण्यावर अन्यथा नदीच्या पाण्यावर ऊस लागवडी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news