राजिवडी गावात भोर प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा
भोर, पुढारी वृत्तसेवा: निरा देवघर, भाटघर धरणाच्या बॅक वॉटरवर असलेल्या पर्हर बुद्रुक, राजिवडी गावात भोर प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील बहुतेक गावे टँकरमुक्त होत असताना दोन ते तीन ग्रामपंचायतींना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
भोर पंचायत समितीकडून पर्हर बुद्रुक, राजिवडी, कुंड, शिळींब येथील वाडीवस्तीवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धरणाची पाण्याची पातळी जसजशी खोल जाते तसतसे या गावातील विहिरीच्या पाणी पातळीत घट होते. तसेच शिवकालीन टाक्यामधील उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पातळी खलावते. यामुळे पर्हर बुद्रुक, राजिवडी, शिळींब, कुंड या ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई निर्माण होते.
परंतु येथील नागरिकांना दिवसाआड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे बाळासाहेब सकट यांनी सांगितले. भोर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांतून राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन योजना राबविल्या असल्यामुळे अनेक ग्रामपंचायती पाणीटंचाईतून मुक्त झाल्या आहेत.
उर्वरित पर्हर बुद्रुक, राजिवडी, शिळींब, कुंड येथे वाडी-वस्तीचे अंतर लांब असल्यामुळे पाणी योजना करण्यासाठी अडचण येत आहे. आगामी काळात ही गावे टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील राजेंद्र पिसाळ यांनी सांगितले.
हेही वाचा