![चाकणला तीन अपघातांत दोन जण ठार; दोघे गंभीर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2Faccident-11.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चाकण : पुढारी वृत्तसेवा
खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसरात अपघाताच्या तीन घटना घडल्या असून, यात दोघांचा मृत्यू; तर दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाळुंगे व चाकण पोलिसांत गुन्ह्यांची नोंद केली आहे. अपघाताची पहिली घटना बहुळ हद्दीत घडली. भगवान चिंतामण गायकवाड (वय 48, रा. चर्होली) हे नातेवाइकांच्या लग्नासाठी मोटारीतून जात असताना एका ट्रकने धडक दिली. यात ते जखमी झाले.
याप्रकरणी ट्रकचालक सागर गंगाराम जाधव (रा. कृष्णापुरी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना खालुम्ब्रे (ता. खेड) गावात घडली. यात दुचाकीवरून जात असलेल्या लक्ष्मण खंडूजी गुटूलवाड (वय 54) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा शंकर लक्ष्मण गुटूलवाड (वय 25, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अल्लाउद्दिन चांद नदाफ (वय 40, रा. पुणे) याला अटक केली. महाळुंगे पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तिसरी घटना बुधवारी (दि. 25) पहाटे कुरुळी फाटा येथे घडली. यात दुचाकीवरून जाणारे संजय अंबादास कैतके (वय 33, रा. मोशी) यांचा मृत्यू झाला; तर रतन पाटील (रा. मोशी) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रदीप बबन पिंगळे (रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास महाळुंगे पोलिस करीत आहेत.