सर्वसामान्यांच्या रेशनवरील गव्हाला कात्री; आता 1 किलो गहू, चार किलो तांदूळ मिळणार
नरेंद्र साठे
पुणे : सर्वसामान्यांना आधार असलेल्या रेशनवरील गहू आता कमी झाला आहे. बाजारातून गहू खरेदी करणे न परवडणार्या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो. परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू कमी करून त्याऐवजी तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे; परंतु पुरवठा विभागाकडून त्याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत. प्राधान्य कुटुंबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
‘अंत्योदय’साठी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत होता. आता तो दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जाणार आहे. रेशन धान्य उशिरा मिळाल्याच्या तक्रारी वाढतात, पण आता थेट धान्यच कमी केल्याने नागरिकांच्या रोषाला पुरवठा विभागाला सामोरे जावे लागणार आहे. मुख्य धान्य म्हणून गहूच वापरला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरची पोळी भाजण्यासाठी त्यांना आता खासगी विक्रेत्यांकडून गहू खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून कमी उत्पादनामुळे गहू महागला आहे.
गव्हाच्या सरकारी खरेदीत घट झाल्यामुळे गव्हाचे वाटप मे महिन्यापासून गव्हाचा साठा कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही दुरुस्ती केली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्येही गव्हाचा कोटा कमी करण्यात
आला आहे.
अंत्योदय शिधापत्रिका प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका
49,146 5,32,702
लाभार्थी लाभार्थी
2,17,601 24,82,373
रेशनमध्ये गव्हाची कपात करण्यात आली आहे. मात्र, तांदूळ वाढविण्यात आला आहे. प्राधान्य कुटुंबांना मोफत एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, तर अंत्योदय योजनेत दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जाणार आहे.-सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी
हेही वाचा :