VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक | पुढारी

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस्टर व्हेरी व्हेरी स्पेशल असे संबोधल्या जाणारे आणि भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (vvs laxman) यांना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. वास्तविक, येत्या महिन्यात होणाऱ्या दोन दौऱ्यांसाठी बीसीसीआय दोन वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कसोटी संघासह इंग्लंडला जायचे आहे आणि त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. अशा स्थितीत द्रविड कसोटी संघाचे प्रशिक्षक असतील. तर लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध युवा ब्रिगेडचे प्रशिक्षक असतील.

टीम इंडियाला येत्या दोन महिन्यात दोन महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. एक कसोटी इंग्लंडमध्ये आणि दुसरी टी 20 आंतरराष्ट्रीय मायदेशात. या दोन मालिकांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या संघांसोबत स्वतंत्र कोचिंग स्टाफ असेल. (vvs laxman)

क्रीडा विषयक वेबसाईटच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर महत्त्वाची दिली आहे. त्या अधिका-याच्या माहितीनुसार बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी आम्हाला 24 जूनपासून लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. राहुल द्रविड 15-16 जूनला संघासोबत रवाना होणार आहे. अशा स्थितीत आम्ही लक्ष्मण (vvs laxman) यांना आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध संघाचे प्रशिक्षक बनवण्याची शक्यता आहे.

आठवडाभरात होणार संघाची घोषणा

निवडकर्ते एका आठवड्यात टीम इंडियाची घोषणा करू शकतात. कसोटी संघात नियमित खेळाडूंची निवड केली जाईल, तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना टी-20 संघात संधी मिळू शकते.

वरिष्ठ खेळाडूंना साडेतीन आठवडे विश्रांती…

बीसीसीआयने आधीच सूचित केले आहे की, द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शिखर धवन किंवा हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सूत्रांनी म्हटलंय की, ‘वरिष्ठ खेळाडूंना किमान साडेतीन आठवडे विश्रांती मिळू शकते. रोहित, कोहली, राहुल, पंत आणि बुमराह आयपीएलनंतर थेट इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी खेळणार आहेत. इंग्लंड मालिकेसाठी आमचे सर्व खेळाडू ताजेतवाने असावेत, अशी आमची इच्छा आहे.’

9 जूनपासून टी-20 मालिका सुरू

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बंगळूर येथे सामने होणार आहेत. ही मालिका 19 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची यूथ ब्रिगेड 26 आणि 28 रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय कसोटी संघ गतवर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातील उर्वरित कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान खेळणार आहे.

गेल्या वर्षीही असेच घडले होते..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यासह युवा संघाची निवड करेल. दुसरा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी असेल. गेल्या वर्षी इंग्लंड आणि श्रीलंकेत दोन भारतीय संघ खेळले होते. शिखर धवन आयपीएलमधील अव्वल खेळाडूंनी बनलेल्या T20 संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो. कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याचेही नाव आहे.

Back to top button