

पुणे : पुढारी वृत्तसेवा
देश आणि महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांचा घात करण्याचे काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. तसेच सहकारी चळवळीचे वाटोळे आणि श्राद्ध घालण्याचे कामही त्यांनीच केले असून, ते शेतकऱ्यांची जाणते नाही तर माती करणारे नेते असल्याची कडवट टीका भाजपचे नेते आणि राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली.
साखर आयुक्त कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास शुक्रवारी (दि.६) ते उपस्थित राहिले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे व अन्य शेतकरी उपस्थित होते.
खोत पुढे म्हणाले की, ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे असे म्हणणाऱ्या पवार यांनीच मध्यंतरी हर्बल गांजाचे पीक करा, असा संदेश दिला होता. म्हणून त्यांनीच हर्बल गांजाचे बियाणे पुरवावे, म्हणजे आम्ही ऊस लावायचा बंद करतो. वास्तविक पाहता शरद पवार यांच्या राजकारणाचा मळा आपणास आज जो फुललेला, बहरलेला दिसतोय आणि त्या मळ्यात आज लागलेली फळे दिसत आहेत, ती सर्वस्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावरच आहेत असेही ते म्हणाले. ऊस पीक हे आळशी शेतकऱ्यांचे आहे असे म्हणणाऱ्या पवार यांनी त्यांचे पुतणे, नातू हे सहकारातील कारखाने खाजगीकरणातून घशात घालत आहेत, कवडीमोल भावाने घेत आहेत, याचे उत्तर पवार यांनी प्रथम द्यावे, असेही खोत यावेळी म्हणाले.
गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळासाठीची रक्कम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून देण्याचे घोषित केले होते; परंतु महाविकास आघाडी सरकारने त्यात बदल करीत ऊस उत्पादकांच्या बिलातून प्रति टन १० रुपये असे कापण्याचा निर्णय केला. म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' अशी सरकारची अवस्था आहे, त्यामुळे अशी रक्कम कापताना शेतकऱ्यांची संमती घ्यावी लागेल, आम्ही अशी रक्कम कापू देणार नाही. कारण शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालून तुम्ही दिवाळी साजरी करणार असाल तर आम्ही हे चालू देणार नाही, तुम्हांला सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, असा इशाराही खोत यांनी दिला.