नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातील आव्हाटे येथील देहाडे कुटुंबातील सासरा, सून आणि मुलगा अशा तीन सदस्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिक्षणाला वय नसते. आपल्याला शिकता नाही आले तर मुलांनी तरी शिक्षण घ्यायला हवे, अशी धारणा ग्रामीण भागात रुजू लागली आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे यावरून समोर येत आहे. सोशल मीडियावरही त्यांची यशोगाथा गाजत आहे.
बारावीच्या निकालामध्ये जिल्ह्यातून एक सुखद धक्का देणारी घटना समोर आली आहे. देहाडे कुटुंबातील तिघे जण एकाचवेळी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. कुटुंबातील पिता, पुत्र आणि सूनबाई हे सर्व एकसोबत बारावी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. कुटुंबप्रमुख लक्ष्मण देहाडे (42) यांनी अपूर्ण शिक्षण पूर्ण करत इयत्ता 12 वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि 64.50 टक्के गुण मिळवत तालुक्यात एक आदर्श घालून दिला आहे. त्याचबरोबर मोठी सून वृत्तिका देहाडे 55 टक्के व लहान मुलगा समीर 64 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. देहाडे कुटुंबीयांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शिक्षणाविषयी त्यांची गोडी याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना घरातील अन्य सदस्य मुलगा तुषार देहाडे तसेच पत्नी विमल देहाडे यांनी त्यांच्या या यशात मोलाचा वाटा दिला असल्याचे लक्ष्मण देहाडे यांनी सांगितले.
अनेक जण वयोवृद्ध असूनही परीक्षा देतात. माझी बारावी झाली नसल्याची खंत होती. मुलगा आणि सूनबाई बारावीलाच होते. त्यांनी मला परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले. त्यानुसार मी परीक्षा दिली अन् चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा मला आनंद आहे.
– लक्ष्मण देहाडे, सासरे