![नाशिक : भाजपा –शिवसेनेतर्फे 30 मार्चपासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
गौरव यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यामध्ये नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही आहेर यांनी सांगितले. राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिले. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार आहेत. दि. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आ.डॉ.राहुल आहेर यांनी नमूद केले. यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच उत्तर महाराष्ट्र – आ. जयकुमार रावल व प्रदेश महामंत्री, विजय चौधरी, नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, संघटन महामंत्री प्रा.सुनील बच्छाव, महामंत्री नंदकुमार खैरनार, महामंत्री भूषण कासलीवाल, निफाड तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम आदी भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.