नाशिक : पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडेलत्ते, भांडी खरेदीचा योग नागरिकांनी आवर्जून साधला. अक्षय तृतीयेनिमित्त व्यापाऱ्यांनीदेखील विविध आकर्षक योजना जाहीर केल्याने, ग्राहकांनी त्याचा चांगलाच लाभ घेतला. दिवसभर बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल दिसून आल्याने, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापारीवर्ग सुखावला आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली होती. अक्षय तृतीयेलादेखील अशीच उलाढाल होईल, असा अगोदरच अंदाज वर्तविला जात हाेता. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर अक्षय तृतीया हा सण उत्साहात साजरा करण्याची संधी मिळाल्याने, ग्राहक वर्गांनेदेखील खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे दिवसभर सराफ बाजारात ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून आली. त्यातच गेल्या तीन आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेले सोन्याचे दर जवळपास तीन हजार रुपये प्रति १० ग्रॅमने कमी झाल्याने, ग्राहकांसाठी हा मोठा योगच जुळून आला. लग्नाचे मुहूर्त लक्षात घेता, सोने-चांदी खरेदीला मोठे प्राधान्य दिले गेले. गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरही भर दिला गेला. 'उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने वातानुकूलन यंत्रणा (एसी), कूलर आणि रेफ्रिजरेटरला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर जुन्या वस्तूंच्या जागी नवीन वॉशिंग मशीन, टीव्ही आदी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदीचाही ट्रेंड दिसून आला. मोबाइल, लॅपटॉप, कॅमेरा आदी वस्तूंची मागणी कायम असल्याचे दिसून आले. रिअल इस्टेट व वाहन बाजारातही मोठी उलाढाल झाली. गुढीपाडव्याला झालेली उलाढाल अक्षय तृतीयेलाही कायम होती. तर वाहन बाजारात बहुतांश ग्राहकांनी चारचाकीची डिलिव्हरी घेण्यास प्राधान्य दिले. सणाच्या जोडीला लग्नसराईही सुरू असल्याने कपडे आणि भांड्यांची बाजारपेठही फुलली. एकूणच अक्षय तृतीयेनिमित्त बाजाराला झळाळी मिळाल्याने, व्यापारीवर्ग सुखावल्याचे दिसून आले.
चार हजाराने चांदीचे दर घटले : चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र रशिया-युक्रेन युद्धात शिथिलता येताच सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू झाली. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २,७०० तर चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोने-चांदीची मोड विकून नफा कमविला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. अक्षय तृतीयेपर्यंत चांदीचे दर चार हजारांनी घटल्याचे दिसून आले.
गुढीपाडव्यापेक्षा अक्षय तृतीयेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत भाव कमी झाल्याने, ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले. अनेकांनी गुंतवणूक म्हणूनदेखील खरेदी केली. लग्नसराई आणि सण एकत्र आल्याने, ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेतला. – गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
हेही वाचा :