नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आघाडी सरकार म्हणजे अलिबाबा चाळीस चोरांचे सरकार असून, राज्यात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असल्याने जनता या सरकारला येत्या महापालिका निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केले. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, कार्यालयीन प्रमुख सुरेश गायकवाड, प्रदेश चिटणीस मनोज पवार, प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे, नाशिक अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक हिरे आदींनी मार्गदर्शन केले. भालेराव म्हणाले की, राज्यात एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. मागासवर्गीयांच्या महामंडळाचा निधी कमी करण्यात आला असून, हे सरकार दलितविरोधी आहे.
अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी प्रास्ताविक, तर भाजप अनुसूचित जाती मोर्चा शहर प्रभारी प्रा. कुणाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीस नगरसेवक श्याम बडोदे, शहर सरचिटणीस कुंदन खरे, शरद मोरे, अंबादास पगारे, रवींद्र देवरे, राकेश दोंदे, भगवान दोंदे तसेच अण्णासाहेब डोंगरे, संतोष वसईकर, कुणाल पानपाटील, धनंजय मंगळे, योगेश पाथरे, लता बाविस्कर, विकास अवरमल, चंद्रकांत पाटोळे, अशोक लोंढे, विजय गाडे, कविता तेजाळे, वैशाली त्र्यंबके, रूपाली हिरे आदी उपस्थित होते.