जळगाव पुढारी वृत्तसेवा – खरीप हंगामाची सुरुवात झालेली असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी करण्यात येत आहे. यामध्ये राशी कापसाचे 659 या वाणाची मागणी होत आहे. मागणी जास्त असल्याचा फायदा घेत या बियाण्याचे पाकीट बाजारात बाराशे रुपयांच्या जादा दराने विकले जात आहे. आज (दि. 24) रोजी म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून विक्रेत्याला ज्यादा दराने बियाण्याची विक्री करताना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे.
आज दि. 24 रोजी जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर तत्काळ सापळा रचण्याचे ठरवले. पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट 1200 रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा, विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
या कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, धीरज बडे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते.
कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिलेला असून शेतकऱ्यांनी ज्यादा दाराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाची मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते. शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
हेही वाचा –