

संगमनेर: सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी करत, आक्रमक होत नाशिक-पुणे महामार्गावर काल मंगळवारी (दि. २१) दीड तास रास्ता रोको केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शासकीय बफर स्टॉक मधून युरिया उपलब्ध करून दिल्याने थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपला रास्ता रोको मागे घेतला.
नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी युरियाच्या उपलब्धतेसाठी काल भव्य रास्ता रोको केला. सुमारे दीड तास महायुती सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत व चुकीच्या धोरणांवर यावेळी शेतकऱ्यांनी केली. आंदोलन अधिक आक्रमक होत असल्यामुळे काही शेतकरी व प्रशासनाने थोरात यांना या आंदोलनात मध्यस्थीची विनंती केल्याने त्यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, पोलिस उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि या हंगामामध्ये पिकांना युरिया आवश्यक आहे. शासनाकडे बफर स्टॉक आहे. परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी परवानगी मिळत नाही.
पहाटे पाच वाजेपासून शेतकरी महिला या ठिकाणी रांगा लावून आहेत. परंतु मर्यादित स्टॉक दिल्याने तो संपला आहे. वेळेवर शेतकऱ्यांना युरिया देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सर्वत्र अवमेळ आहे. खतांच्या किमती वाढल्या आहे. सर्वत्र शॉर्टेज झाले आहे. वाटपामध्ये कोणतेही नियोजन नाही. अत्यंत गोंधळाचे आणि ढिसाळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यामध्ये सर्वाधिक काळ कृषिमंत्री म्हणून आपण काम केले अशी परिस्थिती कधीही नव्हती. नव्याने आलेला लिंकिंग हा काय प्रकार आहे हे कधी आपण पाहिले नव्हते. बळजबरीने काही खाते शेतकऱ्यांवर लादण्याचा हा प्रकार आहे. देश पातळीवरील मोठ्या कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहे. नक्कीच यामध्ये कुणीतरी भाग घेत असल्याने ते धाडस करत आहेत. शेतकऱ्यांना नडवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे हा धंदा सुरू आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. एक तर शेतमालाला भाव मिळत नाही. दुसरीकडे खतांची भाव वाढले आहे.
काळाबाजारने आणि खत विकले जात आहे. त्याच्यावर कुणाचे नियंत्रण नाही. प्रशासनाने त्यांच्या ताब्यातील बफर स्टॉक तातडीने रिलीज करावा, अशा सूचना थोरात यांनी कृषी विभागाला दिल्यानंतर आहे तो स्टॉक देण्याचे मान्य केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
शेतकी संघात पारदर्शक वाटप असल्याने बफर स्टॉक वाटण्याचे काम त्यांच्याकडे द्यावे. शासनाच्या ताब्यात असलेल्या बफर स्टॉक मधून असलेली सर्व युरिया वाटण्याचे सर्व अधिकार शेतकी संघाला द्यावे, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.