

नगर: एकीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत असताना, दुसरीकडे अजुनही भौतिक सुविधा देण्यात प्रशासन काहीसे मागेच असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशा वर्ग खोल्या नाहीत. नवीन बांधण्यासाठी आणि आहे त्या खोल्या दुरुस्तीसाठीही पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे आजही 540 नवीन वर्ग खोल्या कागदावरच रेंगाळल्या आहेत. तर, 1099 शाळा खोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा नियोजनमधून याकामी भरीव तरतूद व्हावी, अशी पालकांची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेच्या 3545 हजारापेक्षा अधिक शाळा आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि काही ठिकाणी अगदी आठवीपर्यतही वर्ग भरवले जात आहे. 2,25,000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सर्व शाळांमध्ये साधारणतः 12 हजारापेक्षा अधिक वर्ग खोल्या असल्याचे आकडे सांगतात. मात्र, विद्यार्थी संख्या लक्षात घेता ह्या वर्ग खोल्या कमी पडत आहेत. परिणामी, आजही काही शाळांचे वर्ग झाडाखाली, समाजमंदीरात व अन्य पर्यायी जागेत भरवले जात असल्याचे प्रशासनाकडून समजते.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत झेडपीच्या शाळांमध्ये मिशन आरंभच्या माध्यमातून शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षेत नगरचा डंका वाजला आहे. ‘मिशन आरंभ’ ह्या नगरी पॅटर्नची राज्याच्या शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. असे असताना, वर्ग खोल्यांची कमतरता हा त्या त्या तालुक्याचे, गावचे राज्यकर्ते आणि प्रशासनाचे नैतिक अपयश असल्याचेही बोलले जाते.
इन्ट्रॅक्टीव्ह पॅनेलऐवजी खोल्याच बांधून द्या
जिल्हा नियोजनमधून ‘नावीन्यपूर्ण’ योजनांतून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये इन्टरॅक्टीव्ह बोर्ड देण्यात आले आहेत. यातून विद्यार्थ्यांना फायदाही होत आहे. मात्र, आज संगणकापेक्षा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्यांची गरज अधिक आहे. यासाठी सन 2026-27 च्या आराखड्यात वर्ग खोल्यांसाठी पुरेसा निधी मिळवा, अशी मागणी पुढे येतान दिसत आहे.
गतवर्षी 181 नवीन खोल्या
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेला गेल्यावर्षी मोठा निधी प्राप्त झाला होता. यातून 181 नवीन वर्ग खोल्या बांधण्यात यश आले, तर 122 वर्ग खोल्यांचीही दुरुस्ती झाली होती. यातून संबंधित शाळांचा आणि तेथील विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र हा निधीही कमीच होता.
शाळा खोल्यांचे 20 कोटी ‘साई भरोसे’!
साई संस्थानने शाळा खोल्यांसाठी 30 कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यातील पहिला 10 कोटींचा हप्ता मिळाला. यातून 87 वर्ग खोल्या झाल्या. आता उवर्रित 20 कोटी मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेतून दि. 9 डिसेंबर 2024 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, संस्थानमध्ये विश्वस्त नाही, न्यायालयीन देखरेखीत संस्थानचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत्त हा निधी मिळू शकत नाही. जर हे 20 कोटी आणि जिल्हा नियोजनमधून 30 कोटींचा निधी प्राप्त झाला, तर जिल्ह्यातील 514 शाळा खोल्यांची कामे मार्गी लागू शकतात.
398 खोल्या धोकादायक?
गतवर्षी 2025 मध्ये जिल्ह्यात तब्बल 398 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचा अहवाल पुढे आला होता. यावर्षीही किती वर्ग खोल्या धोकादायक आहेत, निर्लेखनाची गरज आहे, याची माहिती शिक्षण विभागाने मागावली होती. मात्र या पत्राला दोन महिने उलटून गेली, तरीही तालुक्यांतून गटशिक्षणाधिरी यांनी ही माहिती प्रशासनाला पाठवली नसल्याचेही समजले. त्यामुळे हा निष्काळजीपणाही सीईओंनी गांभीर्याने घेण्याची गरज बोलली जात आहे.
या खोल्यांना निधी देणार का?
अकोले 39
संगमनेर 32
कोपरगाव 24
राहाता 03
श्रीरामपूर 16
नेवासा 25
राहुरी 22
पाथर्डी 38
शेवगाव 33
श्रीगोंदा 52
कर्जत 55
जामखेड 12
पारनेर 17
नगर 30