

संगमनेर: दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरकर काल बुधवारी (दि. २२) रस्त्यावर उतरले होते. या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना युवक, विद्यार्थी, महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले. याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका काँग्रेस नेते थोरात यांनी केली. देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संगमनेर शहरात समविचारी पक्षांच्या वतीने काल बुधवारी (दि.२२) विराट मशाल मोर्चा आयोजित केला होता. संगमनेर बस स्थानक ते महात्मा फुले स्मारक पर्यंत झालेल्या मोर्चात शहरातील व तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, वंचित बहुजन आघाडीचे आजीज ओरा, शिवसेनेचे अमोल बोराडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्याध्यक्ष ॲड. अमोल शेरकर, ॲड. रंजना गवांदे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, डॉ. दानिश, नूर मोहम्मद शेख, अनुराधा आहेर, तुषार पानसरे, समीर लामखडे, अरबाज शेख, भगवान अहिरे, संदीप काकड, दत्ता ढगे, छात्र भारतीचे विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
संगमनेर बस स्थानक येथे संगमनेरातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले. तेथून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मशाल मोर्चा महात्मा फुले पुतळा येथे आला.
यावेळी लोकनेते थोरात म्हणाले, सोनम वांगचुक ही देशातील आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे २१ दिवसापासून जंतर-मंतरवर उपोषण सुरू आहे. त्यांचा आवाज हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाज आहे. परंतु केंद्र सरकारला तो ऐकू येत नाही. केंद्र सरकारला सत्तेचा गर्व झाला आहे. हुकूमशाही पद्धतीने लाठी हल्ला करून अमानुषपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
देशामध्ये दररोज लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टीका माजी आ. डॉ. तांबे यांनी केली. यावेळी अमोल बोराडे, छात्रभारतीचे तुषार पानसरे, ॲड. रंजना गवांदे, अनुराधा आहेर, अजित ओरा यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली.
म्हणून पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन
संसदेमध्ये काँग्रेस नेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केले. अत्यंत अमानुषपणे त्यांची उचल बांगडी करण्यात आली. त्यांची धरपकड करण्यात आली. देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सरकार करत आहे. जनतेचा आवाज दाबला जात आहे, असेही थोरात म्हणाले.