

संगमनेर/घारगाव: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, चाकण या मार्गेच झाली पाहिजे. यात कुठलाही बदल केला तर खबरदार! नाशिक-पुणे महामार्गावर चाकण किंवा आळेफाटा येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करू, सिन्नर ते राजगुरूनगर भव्य व्हेइकल मार्च काढू आणि हा प्रश्न केंद्रस्थानी आणू, असा इशारा नगर-नाशिक आणि पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी (दि.22) सरकारला दिला.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी नगर-नाशिक-पुणे जिल्ह्यातील रेल्वे कृती समितीची बैठक घारगाव परिसरात नांदूर-खंदरमाळवाडी फाटा येथे सोमवारी झाली. दरम्यान, हा रेल्वेमार्ग पूर्वीच्या देवठाणमार्गेच व्हावा, अशी मागणी अकोल्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे; तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सत्यजित तांबे, डॉ. किरण लहामटे, देवदत्त निकम, अतुल बेनके, शरद सोनवणे; तसेच कारभारी उगले, डॉ. अजित नवले, उत्कर्षा रुपवते, नीलम अमोल खताळ, सदाशिव लोखंडे, बाजीराव दराडे, महेश नवले, सत्यशील शेरकर, डॉ. अमोल वाघमारे, कारभारी उगले, अजय फटांगरे आदी उपस्थित होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आ. तांबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीयांना आवाहन केले होते. डॉ. अजित नवले यांनीही सर्व आमदार खासदार व परिसरातील नेतृत्वांना संपर्क करून एकजूट करण्याचा प्रयत्न केला. संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करून आपली मागणी मान्य करून घेण्यावर या वेळी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे एकमत झाले.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडतील, असे ठरविण्यात आले. त्या वेळी आ. तांबे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वेळ देण्याबाबत आश्वस्त केले. या वेळी सर्वच खासदार-आमदारांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी ठोस भूमिका घेत आंदोलनाची दिशा ठरवली. यावेळी महेश नवले, गणेश ताजणे, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, जालिंदर वाकचौरे, अमोल वाघमारे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ, कपिल पवार, दत्ता ढगे, हरिभाऊ तांबे, यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
..तर भव्य व्हेइकल मार्च आणि बेमुदत चक्काजाम
संवादाने प्रश्न मिटेल अशी आशा या वेळी सर्व आमदार-खासदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या सर्व परिसरामध्ये व्यापक जनजागृती करून भव्य लढा उभारण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. सिन्नर ते राजगुरुनगर असा भव्य व्हेइकल मार्च काढून आंदोलनाची तयारी करण्याबाबत यावेळी प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने जनभावना लक्षात न घेतल्यास चाकण किंवा आळेफाटा या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन करून हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.