

राहुरी/देवळाली प्रवरा: तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरात काल मंगळवारी (दि. 23) दुपारी वीजवाहक तारा तुटून खाली कोसळल्याने आठ गायींचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास परिसरात रिमझिम पावसासह जोरदार वादळी वारे वाहत होते. अचानक आलेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून जनावरांच्या गोठ्याजवळ कोसळल्या. तारा जमिनीवर पडताच परिसरात विद्युत प्रवाह पसरला.
तेव्हा मच्छिंद्र काळे यांच्या गोठ्यातील गायी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांना जबरदस्त शॉक बसला असून काही क्षणांतच आठ गायी जागीच ठार झाल्या. एकाचवेळी आठ जनावरे दगावल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुग्ध व्यवसाय आणि शेतीपूरक म्हणून सांभाळलेल्या जनावरांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सत्यजीत कदम, शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत जनावरांची पाहणी करून काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच नगराध्यक्ष कदम यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून त्वरित आर्थिक मदत व योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांची तपासणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.