![‘स्वराज्य’ची नाशिकमध्ये पुन्हा मोटबांधणी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून असलेल्या 'स्वराज्य'ची वाटचाल फुटीमुळे काहीशी डगमगली होती. त्यामुळे स्वराज्य नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणार काय? याविषयी प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, स्वराज्यप्रमुख संभाजीराजे यांनी नाशिक लोकसभेच्या दृष्टीने काही नियुक्त्या जाहीर केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 'स्वराज्य'ने जणू काही आपला दावा दाखल केला आहे.
स्वराज्यप्रमुख संभाजीराजे यांचे नाशिक प्रेम कधीच लपून राहिले नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाशिकमधील सातत्याने दौरे आगामी लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेला बळ देत होते. त्यावेळी स्वराज्यमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संभाजीराजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याच्या चर्चेला दुजोराही दिला होता. मात्र, वर्षभरातच संघटनेत फूट पडल्याने, नाशिक लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण केली जात होती. संपर्कप्रमुख करण गायकर यांच्यासह नाशिकमधील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने, संघटनेची ताकद काहीशी कमी झाल्याची तेव्हा चर्चा रंगली होती. दरम्यान, स्वराज्यने नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोटबांधणी केली असून, जिल्हाप्रमुख डॉ. रूपेश नाठे यांनी काही नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये शिस्तपालन समिती, राज्य कार्यकारिणी सदस्यपदी ज्ञानेश्वर थोरात, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुूखपदी उमेश शिंदे, शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख विजय खर्जुल, युवक आघाडी जिल्हाप्रमुख नितीन दातीर, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख सागर पवार, कामगार आघाडी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर विसे, आरोग्य आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. सुनील कदम, सहकार आघाडी जिल्हाप्रमुख अंबादास जाधव, महिला आघाडी कोअर कमिटी वंदना कोल्हे यांच्यासह ५४ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. स्वराज्यमध्ये केलेल्या समाधानकारक कार्याच्या जोरावर या नियुक्त्या करण्यात आल्याचे डॉ. नाठे यांनी स्पष्ट केले आहे.