नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत राज्यामध्ये मुदत संपणाऱ्या व पुढील वर्षी नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात प्रभागरचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवार (दि. ६) पासून ही प्रक्रिया सुरू हाेणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदारांनी शुक्रवार (दि. ६) पर्यंत प्रत्येक गावाचे नकाशे निश्चित करायचे आहेत, तर १६ तारखेला संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी गावांमध्ये संयुक्त स्थळपाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे अपेक्षित आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत २६ ऑक्टोबरला प्रभागरचनेची तपासणी केली जाणार आहे. या समितीत गटविकास अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती ३ नोव्हेंबरला प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करेल. तसेच तहसीलदार ४ डिसेंबरला प्रारूप प्रभागरचनेला प्रसिद्धी दिली जाईल. प्रसिद्धीच्या दिनांकापासून ते ११ डिसेंबर या कालावधीत सामान्य जनतेला या रचनेवर हरकती व सूचना नोंदविता येतील. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखल हरकती व सूचनांवर २६ डिसेंबरला सुनावणी घेत अभिप्राय नोंदवून अंतिम प्रभागरचनेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी हे ९ जानेवारीला प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाकडे सादर करतील. तसेच आयोगाच्या मान्यतेनुसार जिल्हाधिकारी हे १६ जानेवारीला अंतिम प्रभागरचनेला प्रसिद्धी देणार आहेत.
हेही वाचा :