![धुळे : मुलीचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2F%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
धुळे पुढारी वृत्तसेवा ; धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक गावात अवघ्या नऊ महिने वयाच्या बालिकेचा गळा आवळून खून केल्यानंतर मातेने देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून धुळे तालुका पोलिसांनी आत्महत्येचे कारण शोधण्याकरता तपास सुरू केला आहे.
धुळे तालुक्यातील वणी गावामध्ये सुधाकर माळी आणि सोनल माळी हे दांपत्य गेल्या पावणेदोन वर्षांपासून विभक्त राहत होते. माळी परिवाराच्या संसारवेलीवर हर्षदा नावाची फुल उमलले. या आनंदात हा परिवार गेल्या नऊ महिन्यांपासून होता. मात्र अचानक हर्षदाच्या झोळीचा दोर सोडून सोनल माळी यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब सुधाकर माळी हे घरी आल्यानंतर निदर्शनास आली. त्यांनी सोनल व हर्षदा यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत पाहिला. दोघांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सोनल आणि हर्षदा या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती परिवाराला दिली. वनी येथे राहणारे सुधाकर माळी यांचा मुख्य व्यवसाय शेती असून गेल्या पावणेदोन वर्षापासून ते पत्नी सोनल समवेत गावातच त्यांच्या दुमजली घरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून सुधाकर माळी हे त्यांच्या आई-वडिलांपासून विभक्त झाले होते. मात्र अचानक सोनल आणि हर्षदा या दोघांच्या बाबतीत अकस्मात मृत्यूची अशी घटना घडल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती कळाल्याने तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोनलचा पती सुधाकर माळी, सासरा ग्यानीराम गंगाराम माळी आणि सासू जनाबाई माळी या तिघांचे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात अद्याप आत्महत्येचे कारण समोर आले नाही. त्यामुळे पोलिस पथकाने आपली चौकशी सुरू केली आहे.