नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी | पुढारी

नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवना सिंचन प्रकल्पाचे काम जर २०२४ पूर्वी सुरू करायचे असेल, तर सर्व संबंधित खात्यांची मंत्रालयात एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रकारचे ना हरकतींचे दाखले, मंजुऱ्या एकाच वेळी देऊन प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू करणार याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री ना. डॉ. भारती पवार यांच्या भारम येथील जनता दरबारात करण्यात आली.

या प्रकल्पासाठी जलविज्ञान संस्थेचे ६५ दशलक्ष घनफूट (१,८४० सहस्रघन मीटर) क्षमतेचे प्रमाणपत्र दि. 20 जानेवारी 2014 रोजी मिळाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता मिळून राज्य शासनाची सुमारे १३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता २० जानेवारी २०२१ ला मिळाली आहे. मात्र नुसती निविदा प्रक्रिया राबविण्यास दोन वर्षे लागली. या सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी कॅबिनेट मंत्री, प्रधान सचिव, विभागप्रमुख व केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित विभागप्रमुखांची संयुक्त बैठक घेऊन सर्व अडचणी एकाच बैठकीत मार्गी लावाव्यात, अशी मागणी जलहक्क समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली. निवेदनावर कृती समितीचे सचिव जगनराव मोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात व इतर ९०० शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

देवना प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावांमधील प्रत्यक्ष 358 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु., रेंडाळे या शिवारांतील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे. कायमच अवर्षणग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. हा राज्यस्तरीय प्रकल्प असून, आजवर २०१२ नंतर जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषी, वने, पर्यावरण या विविध विभागांतून हा विषय गेला आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. खात्यांचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांचे मंत्री व सचिव यांनी संयुक्त बैठक घेऊन आपले केंद्रातील मंत्रिपद यांच्या प्रभावाने राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रकल्पास परिपूर्ण करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

10 वर्षे निघून गेली आहेत. समुद्धी महामार्गासारखे महाकाय प्रकल्प पूर्ण होतात. त्यांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी मिळतात. शेतकऱ्यांची मागणी असलेल्या विषयांवर मात्र सरकार सोईस्कर दुर्लक्ष करते. – भागवतराव सोनवणे, संयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला

असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प…
* एकूण खर्च मान्यता : १२ कोटी ७७ लाख रुपये.
* लाभार्थी गावे : राहाडी, खरवंडी, देवदरी.
* सिंचन क्षमता : ३५८ हेक्टर.
* उपलब्ध पाणी : ६५.३३ दशलक्ष घनफूट.
* धरणाची लांबी : २२५ मीटर.
* धरणाची उंची : १६.१८ मीटर.
* सांडव्याची लांबी : ९० मी.
* बुडित क्षेत्र : ५७ हेक्टर

हेही वाचा:

Back to top button