जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास | पुढारी

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यावर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून त्यासाठी 27 मेपर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत.

गेल्या वर्षापासून विद्यापीठाने हा पुरस्कार सुरू केला असून 51,000 रु., स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. पहिला पुरस्कार गेल्या वर्षी सामाजिक क्षेत्रासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ या संस्थेला देण्यात आला होता. कृषी उत्पादन, विस्तार, कृषी प्रक्रिया, पीक फेरबदल, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर, नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समाजाला झालेला उपयोग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य, फलोत्पादन, वनौषधी व सेंद्रीय पद्धती या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍याला या वर्षाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी. व्यक्तीचे वय 40 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे. संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्यदेखील त्या क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक असावे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावली या विषयीची माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञ निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर पुरस्कार जाहीर केले जातील. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत शनिवार, दि. 27 मे आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button