परभणी : ४५० एकर जमिनीवर दररोज ५ लाख युनिटची वीजनिर्मिती | पुढारी

परभणी : ४५० एकर जमिनीवर दररोज ५ लाख युनिटची वीजनिर्मिती

मानवत : डॉ. सचिन चिद्रवार :  निसर्गाचा लहरीपणा, शेतगडी व मजुरांचे वाढत चाललेले भाव, शेतमालाचे घसरलेले भाव यासह अनेक कारणाने शेतकरी त्रस्त झाला आहे. मेहनत करूनही शेवटी हातात काही राहत नसल्याच्या कारणावरून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जवळपास ४५० एकर जमिनी ५ खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला भाडेतत्त्वावर किरायाने दिल्या आहेत. या प्रकल्पातून दररोज ५ लाख युनिटची वीजनिर्मिती केली जात असून शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळत आहे.

मानवत परिसरात ५ खासगी कंपन्यांनी सौर उर्जा निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. रिन्यू सनलाईट एनर्जी अॅन्ड रिन्यू सन शक्ती २५० एक्कर क्षेत्रावर ५० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प, हिंदुजा रिन्युएबल वन प्रा. लि. ५१ एक्कर क्षेत्रावर २० मेगावॉट क्षमता प्रकल्प, एम. एच. टेक्निक सोलार इंडिया प्रा. लि. १०२ एकरमध्ये २७ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प, अल्काईल अमिन्स केमिकल लि. चा ५ मेगावॉट क्षमता प्रकल्प व अन्य एका कंपनीचा १४ मेगावॉट क्षमता असलेला प्रकल्प कार्यान्वित आहे. या पाच प्रकल्पातून एकूण ११७ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. साधारपणपणे दररोज ५ लाख युनिटची वीज निर्मिती होत आहे. ही सर्व वीज पाथरी येथील महावितरणच्या १३२ केव्ही केंद्राला दिली जाते. तसेच पाथरी येथील १३२ केव्ही विद्युत केंद्राच्या माध्यमातून रेल्वे विद्युतीकरणासाठी मानवत रोड येथे होणाऱ्या विद्युत केंद्राला सुध्दा वीजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना फायदेशीर

या सौर उर्जा प्रकल्पासाठी खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमीन २७ वर्ष ११ महिन्यासाठी प्रति एकर २७ हजार रु. प्रमाणे भाडेतत्वावर घेतल्या आहेत. तसेच दर तीन वर्षांनी ५ टक्के वाढ देण्यात येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विशेषतः पडीक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष लाभ झाला आहे. पाच प्रकल्पांसाठी एकूण ४०० ते ४५० एकर जमीन खासगी कंपन्यांनी भाडेतत्वावर घेतली आहे.

काय आहेत फायदे?

या सौर प्रकल्पामुळे शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युतपंपासाठी व्होल्टेजचे प्रमाण स्थिर आहे. त्यामुळे विद्युत पंप खराब होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. तसेच एका प्रकल्पात किमान ५० गरजूना रोजगार उपलब्ध झाल्याने परिसरातील २५० ते ३०० गरजूंना स्थायी रोजगार मिळाला आहे.

केवळ वीजनिर्मितीच नव्हे तर रोजगारनिर्मिती

शेती, उद्योग व व्यापारासाठी वीजेची टंचाई हा सर्वात मोठा अडथळा असल्याने विकास प्रक्रिया खोळंबते. विशेषतः उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते व पुरवठा मर्यादित असल्याने लोडशेडींगला पर्याय नसतो. याचा परिणाम थेट उद्योग व्यवसायावर होतो. वीजेच्या टंचाईवर उपाय शोधण्यासाठी अपारंपारिक उर्जा स्त्रोतापासून वीजनिर्मितीसाठी शासन वेगवगेळ्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असते. अपारंपारिक उर्जास्त्रोतातील सर्वात महत्वाच्या असणाऱ्या सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प केवळ वीजनिर्मितीच नव्हे तर रोजगारनिर्मिती, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरत असल्याचे परभणी जिल्ह्यातील मानवत येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button