नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती | पुढारी

नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित केल्या जाणाऱ्या दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण बघता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणे शक्य असल्याने, महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या कचऱ्याचे आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर संच उभारण्यात आला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत हे दोन्ही सयंत्र बुधवारी (दि. ३) कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील दैनंदिन कचऱ्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याकरिता नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सद्यस्थितीत ट्रोमेलद्वारे वर्गीकरण करण्यात येते. त्यापासून उच्चप्रतीचे आरडीएफ तयार करणे शक्य होते. शिवाय आता उच्चप्रतीच्या प्लास्टिकपासून इंधननिर्मितीही केली जाणार आहे. त्याकरिता कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्याची जबाबदारी नाशिककरांची आहे.

नाशिक महानगरपालिकेने २००१ पासून घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात २००१ मध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा ३०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्लांट उभारण्यात आला होता. त्यानंतर २००८-०९ मध्ये त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता पाचशे मेट्रिक टन प्रतिदिन इतकी वाढवण्यात आली. या केंद्रामध्ये जळाऊ कचऱ्यापासून आरडीएफ तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्प उद्घाटनाप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) बाजीराव माळी, नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक कर्नल सुरेश रेगे, उपमहाव्यवस्थापक मयूरेश अमराळे, उपअभियंता (यांत्रिकी) सुनील खैरनार, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी उपस्थित होते.

घनकचरा प्रकल्पातील उत्पादने

सन २०१६ पर्यंत सदर केंद्र नाशिक महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येत होते. केंद्राचे कामकाज सुरळीत व कार्यक्षमतेने होण्याच्या दृष्टीने सन २०१७ मध्ये सदर प्लांट खासगी एजन्सीमार्फत चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला. या केंद्रात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ निर्मिती, गार्डन वेस्ट व पालापाचोळ्यापासून ब्रिकेट तयार करणे, प्लास्टिकपासून प्लास्टिक दाणे तयार करणे, कचऱ्यातील लीचेटवर प्रक्रिया करणे, मृत जनावरे शवदाहिनी, सायंटिफिक लँडफील, जुन्या लँडफीलचे सायंटिफिक कॅपिंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button