जळगाव : आता सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? एकनाथ खडसेंचा सवाल | पुढारी

जळगाव : आता सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? एकनाथ खडसेंचा सवाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावरून विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. भूखंड घोटाळ्यावरून आपल्याला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का? असा सवाल सरकारसमोर उपस्थित केला.

आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भूषण देसाई यांनी वडिलांची साथ का सोडली? त्याचे कारण म्हणजे भूषण देसाई यांचे ४ लाख 1400 स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचे अवैध वाटप केले. त्यात जवळपास तीन हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. भाजपा आमदार मागे लागले. चौकशी सुरू झाली. सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहे म्हणून ही पावले उचलण्यात आली, असे खडसे म्हणाले.

तोच न्याय भूषण देसाईंना लावणार का?

आता हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे असा निरोप भूषण देसाईंकडे पाठवला, पण ते आता पावन झाले आहे. कारण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली ते आले असून, तुमच्याकडे आला तर सगळं संपलं. माझ्यावर भूखंडाचे आरोप झाले. एक रुपयाचा माझा संबंध त्याच्याशी नाही. तरी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का? असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात सरकारला विचारला.

हेही वाचा:

Back to top button