नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपासून निफाड आणि नाशिकचा पारा स्थिर असून, सोमवारी (दि.7) निफाड येथे 11.8 तर नाशिकमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी थंडीचा कडाका मात्र कायम आहे.
उत्तर भारतामधून येणार्या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील तापमानाच्या पार्यात गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. मात्र, मागील 48 तासांपासून नाशिक व निफाड येथील पारा स्थिर आहे. निफाडच्या गहू संशोधन केंद्रात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पार्यातील या घसरणीमुळे अवघा निफाड तालुका गारठला आहे. थंडीच्या वाढत्या कडाक्यासोबत तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. त्याचा फटका द्राक्षबागांना बसत आहे. थंडीपासून बागा वाचविण्यासाठी पहाटे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविल्या जात आहेत. नाशिक शहरातील थंडीचा जोर कायम आहे. रात्री व पहाटेच्या वेळी थंड वार्यांचा वेग अधिक असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातदेखील थंडीचा कडाका जाणवत असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हिमालयाकडून येणार्या शीतवार्यांचा वेग कायम असल्याने येणार्या काळात जिल्ह्याच्या पार्यात मोठी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.