नाशिक : ‘भारत जोडो’साठी मनमाडला युवक काँग्रेसतर्फे रॅली
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी येथे युवक काँग्रेसतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. यात हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
म. गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल डगळे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीला प्रारंभ झाला. राहुल गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत ही रॅली शहरातील विविध मार्गांवरून जात असताना महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. काँग्रेस भवनाजवळ रॅलीची सांगता झाली. यावेळी राहुल गांधी यांनी सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना एकत्रित करण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली असून, तिला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्यास केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून, त्यांच्या काळात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाल्याचे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी भीमराव जेजुरे, सुभाष नहार, बाळासाहेब साळुंके, संजय निकम, संतोष अहिरे, मिलिंद उबाळे, नाजिम शेख, जाहीद शेख, फकिरा शिवदे, सईद दादा, सिद्धार्थ संसारे, शंकर बोडखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.