नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहत येथे स्वतंत्र पोलिस ठाणे उभारावे अशी मागणी केली आहे. मात्र तरीही विभाजन अजून झालेले नाही. या वसाहतीत गुन्हेगारी वाढली आहे. आज कंपनी व्यवस्थापकाची प्रवेशद्वारावर हत्या करण्यात आली. शहरात वीस दिवसांत आठ खून झाले आहेत. १०० खून झाल्यावर अंबड पोलिस स्टेशन चे विभाजन करणार आहात का असा प्रश्न आमदार सीमा हिरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
औद्योगिक वसाहत मधील सिमेन्स कंपनी जवळ नंदकुमार आहेर वय 50 वर्ष रा. महात्मा नगर, नाशिक यांची आज (दि. 7 ) दिवसाढवळ्या अज्ञात मारेक-यांनी हत्या केली. उद्योग नगरीमध्ये कामगार व उद्योजक यांच्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमदार सीमा हिरे यांनी जिल्हा शासकिय रुग्णालय येथे मयत नंदकुमार आहेर यांच्या नातेवाईकांची भेट घेवून सात्वन केले. त्याठिकाणी उद्योगक्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून नाशिक शहरात खून सत्र चालू असून शहरामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 20 दिवसामध्ये 8 खून नाशिक शहरात झाले असून अश्या परिस्थिती मध्ये पोलिसांनी अधिक दक्ष राहुन धोक्याच्या ठिकाणी गस्ती वाढवल्या पाहिजे. योग्य त्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना सुरु करायला हव्यात. कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता नागरिकांच्या जीविताला संरक्षण मिळणे यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करता कामा असे आ. हिरे यांनी म्हटले.
शासन दरबारी अंबड पोलिस स्टेशनच्या विभाजनाची वारंवार मागणी करुन देखील त्या बदृल कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. पत्र व्यवहार केल्यानंतर अंबड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुन्ह्यांची संख्या व प्रमाण कमी असल्यामुळे तेथे पोलिस स्टेशन विभाजनाचे कारण नाही. असे आम्हास कळविण्यात आले. मतदार संघामध्ये वाढती गुन्हेगारी, घडत असलेले गुन्हे यांचा गांर्भियाने विचार केला असता अंबड पोलिस स्टेशनचे विभाजन होणे अंत्यत आवश्यक असल्याचे सागंत सीमा हिरे म्हणाल्या.