शिवसंपर्क अभियानातून पक्षाला बळकटी मिळणार- खा. धैर्यशील माने
जळगाव (भुसावळ) पुढारी वृत्तसेवा ; शिवसंपर्क अभियानांतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय दौरे करण्यात आले. आज त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. शिवसेनेच्या बळकटीसाठी शिवसेनेमध्ये असणा-या कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी आणि समन्वय साधण्याचा दृष्टिकोनातून हा दौरा आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात शिवसेना जोमाने उभी राहिली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. या भूमिकेतून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचे दौरे केले जात असल्याची माहिती कोल्हापूर येथील शिवसेना खा. धैर्यशील माने यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने संपुर्ण राज्यभरात शिव संपर्क अभियान राबविले जात आहे. यानिमित्त रावेर लोकसभा मतदार क्षेत्राच्या दौऱ्यावर आले असता, खा. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन अभियानाची माहिती दिली. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उप जिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे, धीरज पाटील, दीपक धांडे, मुकेश गुंजाळ, सुधीर गडकरी, आबासाहेब पतंगे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. यावेळी खा. माने म्हणाले, शिवसेनेचे 18 खासदार या सर्व संपर्क दौर्यामध्ये क्रियाशील आहेत. यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून खालच्या पातळीवर प्रत्येक पंचायत समिती गणनिहाय आमची यंत्रणा त्या ठिकाणी जाते आणि त्यांच्याकडून जो डेटा कलेक्ट होईल तो पक्ष संघटनेकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे सांगितले.
- जम्मू-काश्मीर : २४ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मापक्षाची पुन्हा नव्याने बांधणी
शिवसेना पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून जिथे पक्ष मागे पडला आहे, तसेच ज्या ठिकाणी चांगले काम सुरू आहे. असा सर्व ठिकाणची माहिती घेऊन काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षात कोविडच्या काळात सर्वच पक्षांचा संपर्क कमी झाला होता. त्यामुळे आता पुन्हा जोमाने काम सुरू करून शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी केली जात असल्याचे खा. माने म्हणाले.
पक्षाचे आमदार वाढविण्यासाठी प्रयत्नशील
मागील काळामध्ये या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणुका लढवू शकलो नसेल, येथील कार्यकर्ते बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात योग्य ती माणसे डोळ्यासमोर ठेवून पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या दौऱ्याचा संपूर्ण अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. यानंतर राज्यातील २८८ पैकी ज्या मतदारसंघात पक्ष मागे पडला आहे तिथे विशेष जोर दिला जाणार आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना आपली संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा वाढविण्यासाठी धोरण राबवले जात असल्याचे खा. माने यांनी सांगितले.
लोकसभा हे अंतिम उद्दीष्ठ
लोकसभा निवडणूक हे अंतिम उद्दिष्ट असून, यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न झाले पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा अशा पद्धतीने संघटन मजबूत करून सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, यासाठी घराघरात बुथ लेव्हलचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे. यासाठी पक्षाकडून आखणी केली जात आहे. प्लॅनिंगच्या आधारे ज्या मतदारसंघात शिवसेना काठावर आहे. त्या ठिकाणी विशेष जोर देऊन आमच्या पक्षाचे खासदार संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
- अकोले : ‘पेयजल’ला ‘पिंपळगाव’चे पाणी देणार : आ. लहामटे यांचे आश्वासन
- Marathwada Water Crisis :उन्हाच्या तीव्र झळा…मराठवाडा विभागातील केवळ ७ शहरांनाच नियमित पाणी पुरवठा !
- बाटली आडवीच..महिलांचा पुन्हा विजय; निघोजमध्ये दारुबंदीचा निर्णय कायदेशीरच!