नाशिक : चाळीला आग लागल्याने शेतकऱ्याच्या 25 ट्रॅक्टर कांद्याचा कोळसा | पुढारी

नाशिक : चाळीला आग लागल्याने शेतकऱ्याच्या 25 ट्रॅक्टर कांद्याचा कोळसा

निफाड (जि. नाशिक) : वार्ताहर 
निफाड तालुक्यातील काथरगाव येथे रविवार (दि. 15) रोजी दुपारच्या सुमारास वाघ वस्तीवरील कांदा चाळीस आग लागून दोन मोटरसायकलसह सुमारे 25 ट्रॅक्टर कांदा आणि कृषी उपयोगी साहित्य अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत वाघ कुटुंबीयांचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निफाड काथरगाव मार्गावरील वाघ वस्तीवर डॉ. किरण वाघ, राजाराम वाघ आणि काशिनाथ वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. याच ठिकाणी त्यांनी आपल्या शेतातील उत्पादित केलेला कांदा साठवण्यासाठी कांदाचाळ बांधलेल्या आहेत. सध्या कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्याने त्यांनी जवळपास 25 ट्रॅक्टर भरून कांदा चाळीमध्ये साठवलेला होता.
काल रविवार (दि. 15) दुपारच्या वेळेस वस्तीवर कोणीही नसताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वस्तीतून धूराचे लोट येताना दिसले. त्यांनी वाघ वस्तीवर धाव घेतली असता तेथील कांदा चाळींमध्ये आग लागली असल्याचे त्यांना दिसून आले. या शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला असल्याने चाळीत साठवलेल्या सर्व कांद्या सह सायकली आणि शेती उपयोगी साहित्य संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button