नाशिक-औरंगाबाद मार्गावर ‘शिवशाही’जळून खाक | पुढारी

नाशिक-औरंगाबाद मार्गावर 'शिवशाही'जळून खाक

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर मध्यरात्री नादुरुस्त शिवशाही बसला भीषण आग लागल्यामुळे त्यात शिवशाही बस संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने निघालेली शिवशाही बस येवला तालुक्यातील देशमाने येथे मध्यरात्री नादुरुस्त झाली. बसमधील 10 ते 15 प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसवून रवाना करण्यात आले. नादुरुस्त बस नाशिकला घेऊन जात असताना, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील बोकडदरे येथे पालखेड डाव्या कालव्याच्या पुलावर बसने अचानक पेट घेतला. ते पाहून चालक व वाहकाने बसमधून उडी घेतली. त्यानंतर 112 क्रमांकावर फोन करून ही माहिती देण्यात आली. लासलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येण्याआधीच संपूर्ण बस खाक झाली होती.

दरम्यान, बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बसच्या आगीचे कारण अस्पष्ट असले, तरी ती शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी निफाड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button