राहुल पगारे –
भर दुपारी रणरणत्या उन्हात, चेहर्यावर घामाच्या ओघळणार्या धारा.. सिनेमातील एखाद्या पात्राप्रमाणे डोक्यावर हॅट घातलेला सायकलस्वार तरुण वैश्विक शांतता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन शहराची वेस ओलांडून पेठ नगरीत दाखल झाला. त्याने सहजच सगळ्या पादचार्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशी साधलेल्या संवादातून त्याची जागतिक शांततेसाठी असलेली धडपड सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.
झारखंड राज्यातील जमशेदपूर (कदमा) येथील 27 वर्षीय तरुणाचे अधिराज बरूआ असे नाव असून, दोन वर्षांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले. वडिलांसोबत राहणारा एकुलता एक लाडाचा लेक असलेला अधिराज वडिलांच्या रंगकाम आणि इंटेरियर डिझाइनच्या कामात हातभार लावतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून तो आता सायकलवर स्वार होत भारतभ्रमण करत आहे. ओरिसा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा या राज्यातील सुमारे सात हजार किलोमीटरचा अविरत प्रवास करत तो महाराष्ट्र राज्यात दाखल झाला आहे.
अधिराजच्या सायकलवर दैनंदिन वापराच्या मोजक्या काही वस्तू, दोन जोडी अंगावर कपडे, एक गोल टोपी, मोबाइल, अंथरुण आणि एक मच्छरदाणी एवढा लवाजमा..! तो दिवसभरात सुमारे 80 ते 100 किमी प्रवास सहज करतो. शनिवारी भर दुपारी नाशिक- पेठ अंतर सायकलचा प्रवास करून थकलेला असतानाही स्वत:ची ओळख व ध्येय सांगताना त्याच्या चेहर्यावरचे तेज पाहण्यासारखे होते. एवढ्या मोठ्या खडतर प्रवासात समोर येणार्या कोणत्याही संकटावर मात करत पुढे जाण्याची त्याची तयारी आणि आत्मविश्वास भारावून टाकणारा होता. आजवरच्या प्रवासातील अनेक अविस्मरणीय अनुभव त्याने कथन केले. प्रवासात ठिकठिकाणी लोकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद हीच त्याची ऊर्जा असल्याचे तो अभिमानाने सांगतो.
वडिलांच्या पावलावर पाऊल…
अधिराजचे वडील अलोकरंजन बरूआ यांनी 1987 साली वयाच्या 22 व्या वर्षी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणांचे 35 वर्षांपूर्वी वडिलांनी ज्या जागी उभे राहून अनेक छायाचित्र घेतले. त्याच ठिकाणी स्वतःचे छायाचित्रे घेताना अधिराजला खूप आनंद होतो.