murder : नाशिक : पाच जणांचा खून करणाऱ्या संशयिताला अटक | पुढारी

murder : नाशिक : पाच जणांचा खून करणाऱ्या संशयिताला अटक

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : पाच जणांचा खून (murder) व तीन जणांना गंभीर जखमी करून तीन वर्षापासून पसार असलेल्या संशयित आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे २०१९ मध्ये ही घटना घडली होती. हे प्रकरण सीआयडीकडे देखील सोपवण्यात आले होते. नाशिक रोड पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

आरबाज अजगर खान उर्फ गोलु खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या . भुसावळ पोलीस ठाणे हद्दीतील समतानगर येथील जळगाव आरपीआय ( आठवले गट ) जिल्हाध्यक्ष , तसेच भुसावळ नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक रविद्र बाबुराव खरात उर्फ हम्प्या दादा (रा. भुसावळ, जि. जळगाव) व त्याच्या घरातील इतर ४ सदस्य अशा एकूण ५ इसमाचा रिव्हॉलव्हरने फायर करून खून (murder) केला होता.

तसेच इतर तीन जणांना गंभीर जखमी करून हत्याकांड घडवून आणले होते . सदरचे हत्याकांड घडवून आणल्यापासून गुन्हातील संशयित आरोपी आरबाज अजगर खान उर्फ गोलु खान हा फरारी झाला होता. हे प्रकरण विधानसभेमध्ये उपस्थित झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण खुप गाजले होते. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केले होते. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून तीन वर्षाचा कालावधी उलटूनही संशयित आरबाज अजगर हा गुंगारा देत असल्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते .

नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार अनिल शिंदे, विशाल पाटील , विष्णु गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे यांचे पथक जेलरोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आरबाज अजगरला पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

खानदेशाची समृद्ध लोककला वहीगायन

Back to top button