जळगावी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा 'हंडा' मोर्चा, पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी
जळगाव पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्व रहिवासी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मनसेतर्फे आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढण्यात येवून जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवारातील संबंधित रहिवाशी नेहमी न चुकता घरपट्टी, करपट्टी इत्यादी शासनाच्या वेळेवर भरणा करीत असून म.न.पा. प्रशासनकडून देखील सुविधा मिळत नाहीत. नागरिकांच्या ५ वर्षापासून पिण्याचे पाणी, रोड रस्ते, गटारी अशा विविध समस्यांसंदर्भात जि.प. सीइओ यांना वेळोवेळी निवेदन देऊन समस्या सोडविण्यात आलेली नाही. परिसरात ज्या बोअरवेल वरुन पाणी मिळत होते त्या सुध्दा आता उन्हाळा सुरु झाल्याने त्यांची पातळी खोलवर गेली असून त्या बंद झालेल्या आहेत. त्यामुळे नाईलाजाने आपल्या कार्यालयावर पाण्यासाठी तसेच अन्य समस्या निवारणासाठी धडक मोर्चाचे आयोजन करावे लागले असून पाण्याची समस्या त्वरीत सोडविण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, आशीष सपकाळे, मुकुंदा रोटे, राजेंद्र नीकम, कुणाल पवार, संदीप महाले, ‘योगेश पाटील, पंकज चौधरी, कुणाल पाटील, महेश माळी, जसवंत राजपुत आदी उपस्थित होते.