जळगाव : 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्याने भाजप कार्यालयात फटाके फोडून जल्लोष | पुढारी

जळगाव : 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्याने भाजप कार्यालयात फटाके फोडून जल्लोष

जळगाव : प्रतिनिधी : राज्य सरकारने विधानसभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपांवरून भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होेते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आतापर्यत दोनदा सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीअंती कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला असून भाजपाच्या निलंबीत १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन, आ.जयकुमार रावळ यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर्फे ‘वसंत स्मृती’ भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडत पेढे वाटून आनंद व जल्लोष करण्यात आला.

विधानसभेत गेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घालत विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावळ, किर्तीकुमार बागडीया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात येवून भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आमदारांवर सूड भावनेने कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले होते.

तसेच या सर्व १२ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईमुळे अन्याय झाल्याचेही भाजप आमदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राज्य सरकारच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडताना आमदारांचे निलंबन करण्याचा अधिकार हा विधानसभेचा आहे. तो त्यांच्या कार्यकक्षेचा भाग असल्याचं म्हटलं होते.  दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर शुक्रवारी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, अरविंद देशमुख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, नगरसेवक राजू मराठे, विठ्ठल पाटील, सना जहांगीर खान, आनंद सपकाळे, प्रभाकर तायडे, संजय मोरे, गणेश माळी, प्रकाश पंडीत, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, अजय रडे, जयेश भावसार, मिलींद चौधरी, केदार देशपांडे, महेश जोशी, किशोर वाघ, संजय लुल्ला, जयंत चव्हाण, भूषण जाधव, भूषण मोरे, शुभम पाटील आदी मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button