नाशिक : मनपा निवडणुकीचा बार उडणार एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात? दोन-तीन दिवसांत आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता | पुढारी

नाशिक : मनपा निवडणुकीचा बार उडणार एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात? दोन-तीन दिवसांत आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणूक किमान एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या द़ृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आता आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर करता येईल का, या द़ृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. 8 फेब्रुवारी रोजी ओबीसी आरक्षणावर महत्त्वपूर्ण सुनावणी असल्यामुळे प्रभाग रचना जाहीर करण्याचे काम लांबणीवर पडले असून, तत्पूर्वी हरकती व सूचनांचा कालावधी पूर्ण करण्याच्या द़ृष्टिकोनातून येत्या दोन ते तीन दिवसांत आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठी 44 प्रभागांची रचना आणि आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द केले असून, हे आरक्षण वाचवण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेश व अन्य राज्यांची धावपळ सुरू झाली आहे. या द़ृष्टीने 17 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी असल्यामुळे 6 जानेवारी रोजी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा दिल्यानंतरही निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली नव्हती. त्यानंतर आठवडाभरात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल, अशी अटकळ होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 8 फेब्रुवारीपर्यंत इम्पेरिकल डाटा देण्याची मुदत दिली.

8 फेब्रुवारीचा निर्णय बघून त्याचवेळेस प्रारूप प्रभाग रचना आरक्षण सोडत जाहीर करायची की, वेळ वाचवण्यासाठी आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर करून हरकती व सूचना मागवायच्या, असा पेच निवडणूक आयोगासमोर असल्याचे समजते. आरक्षणविरहित प्रभाग रचना जाहीर करायची ठरल्यास किमान 1 फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून पंधरा दिवस हरकती व सूचनासाठी द्यावे लागतील. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघून आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवणे व त्यावर सात दिवसांत हरकती व सूचना घेऊन प्रारूप प्रभाग रचनेबरोबर संपूर्ण प्रक्रिया अंतिम करणे या द़ृष्टीने निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचे समजते.

हरकतींसाठी 15 दिवसांचा कालावधी
1 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून पुढील पंधरा दिवसांचा कालावधी हरकती व सूचनांसाठी देणे व याचदरम्यान 8 फेब—ुवारीनंतर सात दिवसांच्या मुदतीमध्ये आरक्षण सोडतीवर असलेल्या हरकती व सूचनांची कारवाई पूर्ण करावी, असाही मतप्रवाह असल्याचे समजते. तसे झाले तर साधारण 15 मार्चपर्यंत प्रभाग रचना व आरक्षण सोडतीवरील हरकती व सूचनांची कारवाई पूर्ण होणार असून, त्यानंतर साधारण पुढील 40 दिवसांत म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणूक घेता येऊ शकते.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button